पर्यावरण-पशुप्रेमींनी व्यक्त केली चिंता
पनवेल ः वार्ताहर
निसर्गसंपदेने सुसज्ज असलेल्या कर्नाळा अभयारण्य परिसरात मागील काही दिवसांपासून आगीचे सत्र सुरू आहे. विशेष म्हणजे या आगीमुळे कर्नाळा किल्ला व अभयारण्यात परिसरातील वनसंपदा मोठ्या प्रमाणात नष्ट होत असल्याने पर्यावरण-पशुप्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे.
कर्नाळा हे पक्ष्यांसाठी असलेले राज्यातील पहिले पक्षी अभयारण्य आहे. येथे तसेच किल्ल्याच्या सभोवती निसर्गसंपदा आहे, मात्र या परिसरात समाजातील काही घटकांच्या मार्फत ही आग लावण्याचा प्रयत्न केला जातो, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी केला आहे. कर्नाळा अभयारण्य परिसरात असलेल्या जीवसृष्टीला नुकसान पोहचविण्याच्या दृष्टीने होत असलेले हे प्रकार अभयारण्य व्यवस्थापन अथवा वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्याकडून त्वरित थांबविण्याची गरज व्यक्त
होत आहे.
काही दिवसांपूर्वी अभयारण्य परिसरात मोठ्या प्रमाणात वणवा लागला होता. रात्री उशिरापर्यंत हा वणवा सुरूच होता. या सर्व प्रकाराची चौकशी करण्यात यावी, तसेच ठोस उपाययोजना राबविण्याची मागणी पर्यावरण-पशुप्रेमींकडून व्यक्त होत आहे.