अडकलेल्या सर्व भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील
पनवेल : वार्ताहर
रशिया-युक्रेन युध्द सुरू झाले असून युक्रेनमध्ये अनेक भारतीय नागरिक आणि विद्यार्थी असल्याने भारतात चिंता आहे. हे लक्षात घेत तेथील भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी भारत सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली. या पार्श्वभूमीवर या आधी रायगड जिल्हा प्रशासनाने हेल्पलाईन जारी केली होती. या वेळी पनवेल तालुक्यातील समीक्षा सिरसाट, अद्वैत गाडे, रुशक्ती भोगले, कुणाल कुवेसकर, शिल्पीता बोरे, प्रचिती पवार असे एकूण सात विद्यार्थी शिक्षणासाठी युक्रेनमध्ये असल्याची माहिती प्रशासनाला प्राप्त झाली आहे. हे सगळे विद्यार्थी सुखरूप असून पालकही त्यांच्या व्हिडिओ कॉलद्वारे संपर्कात आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली असली तरी या विद्यार्थ्यांच्या पालकांचे जीव टांगणीला लागले आहेत.
पनवेल तालुक्यातील शिक्षणासाठी गेलेले सात विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकल्याची माहिती पालकांनी जिल्हा प्रशासनाला कळवले आहे. एका विद्यार्थ्याच्या म्हणण्यानुसार, पाण्याचे सर्व सोर्स बंद झालेत. पिण्याच्या पाण्यासाठी आतापासूनच मोठी रांग लागली. सर्व लोक आपापल्या घरांत आवश्यक ती साधन सामग्री गोळा करण्याच्या प्रयत्नात आहे.
केंद्र सरकारकडून युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी सुखरूप परत आण्याचे प्रयत्न सुरू झाले असून युक्रेनमध्ये अडकलेल्या 219 भारतीयांना घेऊन रवाना झालेले एअर इंडियाचे पहिले विमान शनिवारी (दि. 26) रात्री मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले. या विमानाने दुपारी रोमानियाची राजधानी बुचारेस्ट येथून भारतासाठी उड्डाण केले होते. रशियन हल्ल्यानंतर युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय नागरिक अडकले आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका व्हावी यासाठी मोदी सरकार प्रयत्नशील असून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना रस्तेमार्गाने रोमानिया आणि हंगेरीत आणण्यात आले असून तेथून विमानाने मायदेशी परत आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. विद्याार्थी सुखरूप परत यावे या करिता पालक आणि त्यांच्या नातेवाइकांनी दिवस रात्र देवाकडे प्रार्थना करीत आहेत.
जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल तालुक्यातील युक्रेन येथे क्षिक्षणासाठी गेलेले सात विद्यार्थी अडकून पडल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाली आहे. आम्ही या पालकांच्या सतत संपर्कांत असून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्फत त्यांना सर्वोपरी मदत करू.
-विजय तळेकर, तहसीलदार, पनवेल