आमदार मंदा म्हात्रे यांची मागणी
नवी मुंबई : प्रतिनिधी
नवी मुंबईतील ग्रामस्थांनी गरजेपोटी बांधलेली 250 मी. पर्यंतची घरे नियमित करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला व याबाबत शासन निर्णय आणला, परंतु नवी मुंबईतील ग्रामस्थांनी गरजेपोटी बांधलेली सर्वच घरे ‘आहे त्या स्थितीत’ सरसकट नियमित करावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व ठाणे जिल्हा पालकमंत्री, राज्याचे नगरविकास एकनाथ शिंदे यांच्याकडे यांच्याकडे केल्याचे आमदार मंदा म्हात्रे यांनी सीबीडी येथे पत्रकार परिषदेतून सांगितले.
आमदार मंदा म्हात्रे यांनी सांगितले की, गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याचा राज्य सरकारच्या या निर्णयात काही त्रुटी आहेत. ग्रामस्थांना वैयक्तिकरित्या आपल्या घरांचा विकास करण्याकरिता चार एफएसआय दिल्यास सोयीचे होईल. कमर्शियल बांधकामे केलेली असताना त्यांना रोजगारासाठी 25 टक्के कमर्शियलदेखील देणे गरजेचे आहे. याकरिता ग्रामस्थांनी गरजेपोटी बांधलेली सर्वच घरे ही विशिष्ट दर लावून नियमित करण्याची आवश्यकता आहे.
राज्याचे विरोधी पक्षनेते व तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2015 पर्यंतची सर्व घरे नियमित करण्याचा निर्णय घेतला होता. मी 2014 पासून सातत्याने लक्षवेधी, तारांकित प्रश्न, औचित्याच्या मुद्द्याद्वारे या प्रश्न विधानसभेत घेत आहे, त्याबाबत सततच्या बैठका व पाठपुरावा करीत आहे. हा प्रश्न मार्गी लागल्यास ग्रामस्थांना खर्या अर्थाने न्याय मिळेल, असे आमदार मंदा म्हात्रे यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला माजी महापौर सुधाकर सोनावणे, भाजप महामंत्री डॉ. राजेश पाटील, विजय घाटे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष दत्ता घंगाळे, प्रदीप गवस उपस्थित होते.