भाजपच्या वैकुंठ पाटील यांनी घेतली भेट
पेण : प्रतिनिधी
युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांमधील रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील श्रद्धा किशोर पाटील ही विद्यार्थिनी शनिवारी (दि. 5)सकाळी सुखरूप आपल्या घरी पोहचली. श्रद्धाचे वडील किशोर पाटील यांनी श्रद्धा घरी सुखरूप आल्यानंतर भारत सरकारचे आणि विशेष करून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.
श्रद्धा पाटील ही युक्रेनमधील विनिस्थिया या ठिकाणी मागील वर्षभरापासून एमबीबीएसच्या पहिल्या वर्षातील शिक्षण घेत होती, मात्र अचानक रशिया आणि युक्रेन यांच्यामधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर तिला आपले शिक्षण अर्धवट सोडून भारतामध्ये परतावे लागलेआहे. युक्रेनहून भारतामध्ये परतेपर्यंत कोणकोणत्या गोष्टी घडल्या आणि भारत सरकारने कशाप्रकारे प्रयत्न केले याची सविस्तर माहिती या वेळी श्रद्धा पाटीलने पत्रकारांशी बोलताना दिली. तर श्रद्धाचे वडील किशोर पाटील यांनी भारत सरकार आणि विशेष करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या सहकार्याबाबत त्यांचे आभार मानले. या वेळी रायगड जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षानेते तथा भाजप रायगड जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांनी श्रध्दाची तिच्या घरी जाऊन भेट घेतली.
या वेळी बोलताना वैकुंठ पाटील यांनी माजी मंत्री तथा विद्यमान आमदार रविशेठ पाटील यांच्या माध्यमातून आपण केलेल्या विनंतीनंतर आणि पत्रव्यवहारानंतर केंद्रीय नागरी हवाई उद्योगमंत्री पृथ्वीराज सिंधिया, केंद्रित पंचायत राज मंत्री कपिल पाटील, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर यांनी तातडीने हालचाली करून आपल्या देशातील हजारो नागरिकांना सुखरूप परत आणण्यासाठी प्रयत्न केले असल्याचे सांगितले.
आमदार रविशेठ पाटील यांच्या माध्यमातून केलेल्या पत्रव्यवहारानंतर देशपातळीवरच्या केंद्रीय मंत्र्यांनी माझ्या मुलीला सुखरूप घरी पोहोचविण्यासाठी चांगले सहकार्य केले आहे. त्याबाबत मी भारत सरकारचे विशेष करून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानतो, मात्र देशातील या विद्यार्थ्यांना अर्धवट शिक्षण सोडून परतावे लागले असल्याने हे शिक्षण भारतात पूर्ण करण्यासाठी केंद्र शासनाने काहीतरी तजवीज करावी, अशी विनंती करतो. अशी प्रतिकीया श्रद्धा पाटीलचे वडील किशोर पाटील यांनी दिली.
युक्रेन आणि रशियातील युद्ध सुरू झाल्यानंतर ते भारताच्या सीमेपर्यंत येईपर्यंतचा प्रवास खूप भयावह होता, मात्र त्यानंतर भारत सरकारच्या माध्यमातून आम्हाला खूप चांगली मदत झाली म्हणूनच मी आज सुखरूप घरी पोहोचू शकले. परंतु शिक्षण अर्धवट सोडून यावे लागले याचीदेखील तेवढीच खंत वाटते.
-श्रध्दा पाटील
RamPrahar – The Panvel Daily Paper