अलिबाग : प्रतिनिधी
सामजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे आजोजित करण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमास प्रारंभ झाला. अलिबाग येथील सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त यांच्या कार्यालयात गुरुवारी (दि. 7) या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एका समाजाचे नेते नाहीत. त्यांनी या देशाला घटना दिली आहे. त्यांच्यामुळेच या देशातील पिढ्यानपिढ्या वंचित राहिलेला तळागाळातील समाज स्वाभिमानाने जगतोय, असे प्रतिपादन सामाजिक न्याय विभागाचे रायगड जिल्हा सहाय्यक आयुक्त सुनील जाधव यांनी या वेळी केले.
जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, रायगड जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी गजानन लेंडी, प्रा. प्रेम आचार्य यांच्यासह पत्रकार, सामजिक न्याय विभागातील कर्मचारी या कार्यक्रमास उपस्थित होते.
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त सामजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे 6 ते 16 एप्रिल या कालावधीत राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम राबविण्याचे निर्देश सामाजिक न्याय विभागाने दिले आहेत. यानुसार रायगड जिल्ह्यात पुढील दहा दिवस विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
सामाजिक समता कार्यक्रम फक्त अलिबागमध्येच आयोजित केले जाणार नाहीत तर रायगड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे, अशी माहिती माहिती सुनील जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दहा दिवस विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. 11 एप्रिल रोजी रायगड जिल्हा परिषद येथे महात्मा ज्योतीबा फुले यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे. 13 एप्रिल रोजी अलिबाग येथे संविधान जागर यात्रा काढण्यात येणार आहे. अलिबाग शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला आभिवादन करून जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ या यात्रेची सांगता होईल. 14 एप्रिल रोजी सामाजिक न्याय विभागांतर्गत अधिस्त सर्व शासकीय कार्यालय, महाविद्यालय, निवासी शाळा, आश्रामशाळा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात येणार आहे. 15 एप्रिल रोजी महिला मेळावा आयोजित केला जाणार आहे. 16 एप्रिल रोजी महाड शहर व तालुक्यातील गावांमधील अनुसूचित जाती व नवबौध्द वस्त्यांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे, अशी माहिती सुनील जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.