महाड : प्रतिनिधी
संपूर्ण दिवसभर तापमानाचा पारा चढलेला असताना अचानक महाड शहर आणि परिसराला सोमवारी (दि. 25) संध्याकाळी विजेचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वार्यासह गारांच्या पावसाने झोडपून काढले. त्यामुळे थंडावा आला असला तरी बागायतीचे मोठे नुकसान झाले आहे.
महाडमध्ये सोमवारी सकाळपासूनच अंगाची लाही लाही होत होती. दुपारी पारा 37 अंश सेल्सियसपर्यंत पोहचला असताना 4 वाजण्याच्या सुमारास संपूर्ण महाड औद्योगिक परिसर तसेच शहर आणि इतर ग्रामीण भागात सोसाट्याच्या वारा आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने सुरुवात केली. काही वेळेतच या पावसामध्ये गारादेखील पडू लागल्या. अचानक सुरू झालेल्या वादळी वार्यामुळे शहरातील अनेक दुकानदारांनी आपली दुकाने बंद करून घेतली होती. या पावसामुळे शेतकर्यांचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
वीटभट्टी आणि आंबा पिकाचे नुकसान
या पावसामुळे आंबा पीक संकटात सापडले आहे. त्याचबरोबर महाड तालुक्यात जवळपास 60 ते 70 वीट उत्पादक आहेत. सध्या लाखोंच्या संख्येने वीट तयार होऊन भट्टी लावण्यासाठी सज्ज असताना अचानक आलेल्या पावसामुळे वीटभट्टीधारक अडचणीत आले आहेत, कारण त्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.
Check Also
पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्या प्रयोगशाळांवर कारवाई करणार
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्या …