Breaking News

नवी मुंबई विमानतळाला ‘दिबां’चे नाव लागल्याशिवाय विमान उडू देणार नाही!

सिडको घेराव आंदोलनातून भूमिपुत्रांचा इशारा

पनवेल : हरेश साठे
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव लागल्याशिवाय एकही विमान उडू देणार नाही, असा इशारा सिडको व राज्य सरकारला देत शुक्रवारी (दि. 24) सीबीडी बेलापूर येथे सिडको घेराव आंदोलनाद्वारे पुन्हा एकदा एल्गार करण्यात आला. या वेळी लोकप्रतिनिधी, भूमिपुत्रांचा जनसागर उसळला होता.
लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचेच नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे तसेच प्रकल्पग्रस्तांचे विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत यासाठी ‘दिबां’च्या स्मृतिदिनी सिडकोविरोधात घेराव आंदोलन करण्यात आले. साडेबारा टक्क्यांचा कायदा दि. बा. पाटील यांच्यामुळेच अस्तित्वात आला. म्हणून एकवेळ भूगोल बदलेल, पण इतिहास बदलणार नाही अशी जोरदार गर्जना करीत ‘दिबां’चा जयजयकार या वेळी संपूर्ण आसमंतात दुमदुमला. घेराव आंदोलन म्हणजे असंतोषाची एक ठिणगी होती. त्याचा वणवा होण्याआधी सिडको व राज्य सरकारने भूमिपुत्र व प्रकल्पग्रस्तांच्या सर्व मागण्या पूर्ण कराव्यात, असा इशारा या आंदोलनातून देण्यात आला. ’दिबां’चे नाव विमानतळाला लागेपर्यंत आणि भूमिपुत्रांच्या विविध मागण्या पूर्ण होईपर्यंत हा लढा कायम राहणार असल्याचे प्रकल्पग्रस्तांच्या नेतृत्वाकडून या ठिकाणी सांगण्यात आले.
लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या नेतृत्वाखाली बेलापूर सीबीडी येथील क्रोमा इलेक्ट्रॉनिक्स येथून सकाळी 10.30 वाजता आंदोलनाला सुरुवात झाली. त्यानंतर भूमिपुत्रांचे हे वादळ सिडको भवनाजवळ धडकले. या वेळी कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी मंत्री व विद्यमान आमदार गणेश नाईक, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, माजी खासदार संजीव नाईक, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार मंदा म्हात्रे, माजी आमदार संदीप नाईक, पनवेलच्या महापौर कविता चौतमोल, रणरागिणी भारतीताई पोवार, उपमहापौर सीताताई पाटील, कॉम्रेड भूषण पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर, ओबीसी नेते राजाराम पाटील, कामगार नेते महेंद्र घरत, दशरथ भगत, नंदराज मुंगाजी, जगदिश गायकवाड, संतोष केणे, गुलाबराव वझे, वाय. टी. देशमुख, जे. डी. तांडेल, नवी मुंबईचे माजी महापौर सागर नाईक, जयवंत सुतार, सुधाकर सोनावणे, रामचंद्र घरत, अर्जुन चौधरी, डॉ. राजेश पाटील, मनोहर पाटील, राजेश गायकर, विनोद म्हात्रे, सीमा घरत, नेत्रा शिर्के यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी, आजी माजी नगरसेवक-नगरसेविका, सर्वपक्षीय समित्या, भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रकल्पग्रस्तांच्या प्रमुख मागण्यांमध्ये प्रकल्पग्रस्तांचे शिक्षण, नोकरी, साडेबारा टक्के भूखंड, गरजेपोटी बांधलेली बांधकामे, गावठाण विस्तार, विमानतळबाधित 27 गावांच्या समस्या, यापूर्वी सिडकोत अनेक ठराव होऊनही प्रकल्पग्रस्तांचे गरजेपोटीची बांधकामे नियमित केली जात नाहीत. नुकत्याच केलेल्या शासन निर्णयात 250 मीटरचे निकष, भाडेपट्टा अशा अनेक त्रुटी असल्याच्या तक्रारी आहेत. सिडकोच्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी व मागण्या मान्य करून घेण्यासाठी हे आंदोलन महत्त्वाची भूमिका बजावणारे ठरणार आहे.
या आंदोलनाचे प्रास्ताविक कृती समितीचे कार्याध्यक्ष तथा भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून आजपर्यंतच्या लढाईची माहिती देत ‘दिबां’च्या नावाचा जयजयकार केला.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे या मागणीसाठी रायगड, ठाणे, पालघर, मुंबई आदी जिल्ह्यांतील प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांनी मागील वर्षी 10 जूनला भव्य साखळी आंदोलन, 24 जूनला ऐतिहासिक सिडको घेराव आंदोलन, 9 ऑगस्टला क्रांतिदिनी मशाल मोर्चा, 17 मार्च रोजी भुमिपूत्र परिषद, सिडको वर्धापन दिनी काळा दिन आंदोलन, 24 जानेवारीला विमानतळ काम बंद आंदोलन अशी भव्य आंदोलने केली. त्यानंतर आजही आंदोलनाची धार प्रखर करीत सिडकोच्या उरात धडकी भरविण्यात आली. या वेळी आगरी-कोळी भाषेतील ‘दिबां’वर आधारित गाणी गाऊन लोकगीत गायक जगदिश पाटील यांनी आंदोलनात आणखी उत्साह आणला.

‘दिबां’चे नाव हा भूमित्रपुत्रांचा अट्टाहास -आमदार गणेश नाईक
लोकांच्या घरांची, नोकरीची कामे सरकारने केली पाहिजेत. झोपडपट्टीत राहणार्‍या लोकांनाही मालकी हक्काची घरे मिळायला हवी. ज्या लोकांनी गरजेपोटी दुकाने किंवा घरे बांधली असतील ती अधिकृत करून दिली पाहिजेत. यासाठी धर्म, जात, पंथ या पलीकडे जाऊन लढा सुरू झाला आहे आणि तो यशस्वी होणार याची खात्री आहे. विमानतळाला ‘दिबां’चे नाव ही केवळ मागणी नसून भूमिपुत्रांचा अट्टाहास आहे, असे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार गणेश नाईक म्हणाले.

आता लढाई आरपारची करायची -लोकनेते रामशेठ ठाकूर
लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की, ‘दिबा’साहेबांचे नाव विमानतळाला लागले पाहिजे आणि प्रकल्पग्रस्तांच्या नोकरी, रोजगार, गावठाण विस्तार व इतर मागण्या पूर्ण होण्यासाठी लढाई उभारली आहे. गेल्या वर्षी याच दिवशी विमानतळाला ‘दिबां’च्या नावासाठी सिडकोला घेराव घातला होता, तर मधल्या कालावधीमध्येसुद्धा प्रकल्पग्रस्त आणि स्थानिकांचे विविध प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी कृती समिती संघर्ष करीत राहिलेली आहे. जोपर्यंत विमानतळाला ‘दिबा’साहेबांचे नाव दिले जात नाही आणि प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न सुटत नाही तोपर्यंत संघर्ष अटळ आहे. आता लढाई आरपारची करायची आहे. प्रकल्पग्रस्तांच्या सर्व मागण्या मार्गी लागल्याशिवाय कृती समिती स्वस्थ बसणार नाही. सिडको एमडी आज आजारी आहेत, असा निरोप आला, पण ते खरोखरच आजारी आहेत की, आंदोलनाच्या धास्तीने आजारी पडले आहेत याची कल्पना नाही, परंतु ते अजून किती दिवस आजारी राहतील? आम्ही मात्र ‘दिबां’च्या नावासाठी आग्रही राहणार आहोत.

भूगोल बदलेल, पण इतिहास बदलणार नाही -दशरथ पाटील
साडेबारा टक्क्यांचा कायदा ‘दिबा’साहेबांमुळे अस्तित्वात आला. त्यांनी सर्व समाजासाठी आपले आयुष्य अर्पण केले. भूमिपुत्रांचे दैवत ‘दिबां’मुळे आपण सर्व भूमिपुत्र एकसंघ झालो आहोत. त्यांनी आपल्या कार्यातून इतिहास घडविला आहे. त्यामुळे भूगोल बदलेल, पण इतिहास बदलणार नाही. इतिहास घडविणार्‍या ‘दिबा’साहेबांचे नाव विमानतळाला लागेपर्यंत आणि भूमिपुत्रांचे सर्व मागण्या पूर्ण होईपर्यंत ही लढाई कायम राहणार असल्याचे या वेळी लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी जाहीर केले.

प्रकल्पग्रस्तांना भाडेपट्ट्यावर ठेवण्याचा कुटील डाव सिडकोने आखला आहे. तो या लढ्यातून हाणून पाडायचा आहे. ‘दिबा’साहेबांचे नाव विमानतळाला लागल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही.
-मंदा म्हात्रे, आमदार

दि. बा. पाटील होणे सोपे नाही. एक बाजूला कुबेर असताना त्यांनी जनता निवडली आणि जनतेसाठी लढत राहिले. मंडल आयोगाची मागणी त्यांच्यामुळे पूर्ण झाली. गाव तेथे शाळा, घर तेथे काम हे ‘दिबां’नी उद्दिष्ट ठेवले. ते सर्व समाजाचे नेते होते. त्यामुळे त्यांचे नाव विमानतळाला मिळालेच पाहिजे.
-भारती पोवार, 1984 सालच्या लढ्यातील रणरागिणी

ज्या सरकारने नाव देण्याचे अमान्य केले त्या सरकारविरोधात उद्यापासून न्यायालयीन लढाई सुरू होणार आहे.
-राजाराम पाटील, ओबीसी नेते

जोपर्यंत ‘दिबा’साहेबांच्या नावाचे विमान उडत नाही तोपर्यंत लढाई सुरूच राहणार आहे. मला एकदा तडीपार केले, पण ‘दिबा’साहेबांच्यासाठी दुसर्‍यांदा झालो तरी चालेल. विमानतळात 95 गावांतील प्रकल्पग्रस्तांना नोकर्‍या मिळाल्या पाहिजेत. बडबड नाही, तर कृती करण्याचे काम समिती करीत आहे.
-जगदिश गायकवाड, माजी महापौर, पनवेल महानगरपालिका

भगवान के घर देर है, अंधेर नही. सिडकोने केलेला ठराव नक्की विखंडित होईल. राज्य सरकारकडून प्रस्ताव गेल्यांनतर केंद्र सरकार गांभीर्याने लक्ष देईल.
-जगन्नाथ पाटील, माजी मंत्री

मागील वर्षी दोन वेळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठका झाल्या, पण त्यांनी जनतेच्या भावना जाणल्या नाहीत. ज्या राजाने जनतेच्या भावना लक्षात घेतल्या नाहीत त्याची आता काय अवस्था झाली आहे.
-कॉम्रेड भूषण पाटील

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply