गेले कित्येक वर्षे अलिबाग तालुक्यातील खारेपाट भागातील खारबंदिस्तीची कामे न केल्यामुळे समुद्राचे खारेपाणी घुसून हजारो एकर जमीन नापीक झाली आहे. समुद्राला उधान आले की, खारेपाटात पाणी शेतात घूसते. उधानाचे पाणी शेतातून आता लोकवस्तीपर्यंत येऊ लागले आहे. हेे असेच सुरू राहिले तर अलिबाग तालुक्यातील खारेपाट पाण्याखाली जाण्याची भीती आहे. या भागातील काही खारबंदिस्तींच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. पंरतु तांत्रिक अडचणींमुळे काम सुरु झालेली नाहीत. याबाबत शासनाने ताडीने निर्णय घेऊन खारबंदिस्तीची कामे करायला हवीत.
खारेपाट भाताचे कोठार म्हणून ओळखला जात होता. खारबंदिस्ती फुटून सतत खारेपाणी भातशेतीत शिरते. या पाण्यामुळे खारेपाटातील शेती उद्ध्वस्त होत आहे. रेवस, हाशिवरे, कावाडे, सोमकोठा, रामकोठा, मल्हार कोठा, नारंगीखार, मानकोळेखार, शिरवली, चिंचवली परिसरातील सुपिक जमिनी, मोर्या खार्या पाण्याने प्रभावित झाल्या आहेत. आजमितीला फार थोडेच शेतकरी आपली शेती वाचवून आहेत. भातशेती पिकविण्यासाठी होणारा खर्च आणि मिळणारे उत्पन्न याचा ताळमेळ बसत नाही. उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. बांधबंदिस्तीची येथे दयनीय अवस्था झालेली आहे.
पावसाळ्यात, तसेच अमवास्या, पौर्णिमा या काळात उधाणाचा मारा मोठ्या प्रमाणात होतो. उधाणाचे पाणी आता लोकवस्तीपर्यंत पोहचू लागले आहे. गावांमध्ये पाणी शिरते, परिणामी शेतकर्यांना भात शेतीबरोबर आपली घरेदारेही वाचविण्यासाठी कसरत करावी लागते. मागील आठवड्यात आलेल्या उधानामुळे धेरंडमध्ये लोकांच्या घरात उधाणाचे पाणी घुसले. लोकांचे नुकसान झाले. मागील काही महिन्यांमध्ये या परिसरात उधाणाचे पाणी धुसले होते. उधाणाच्या पाण्याने शेती नापिक झाली. आता आपले घरदेखील जाण्याच्या भितीने या खारेपाटातील शेतकर्यांची झोप उडाली आहे.
या भागातील शेतकरी केवळ भातशेतीवर अवलंबून नाही तर अनेकांच्या बागायती आहेत, परंतु त्यावरही खार्या पाण्याचा दुष्परीणाम जाणवत आहे. खारेपाटातील बांधबंदीस्तीचा प्रश्न गांभिर्याने घेतला नाही तर भविष्यात खारेपाट उद्ध्वस्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अलिबाग तालुक्यामधील काही खारबस्तींच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. परंतु तांत्रिक अडचणींमुळे कामाला सुरूवात झालेली नाही, हा मोठा प्रश्न आहे.अलिबाग तालुक्यामध्ये एकूण 35 खारबंदीस्ती आहेत. त्यापैकी शहापूर, चरी-कोपर, रामराज, भिजलीबोरघर, वासखार, हाशिवरे खारबंदिस्ती खासगी आहेत. काही खारबंदीस्ती जुन्या आहेत. त्या फुटण्याच्या मार्गावर आहेत. काही ठिकाणी शेतकर्यांनी डागडूजी केली आहे. या खारबंदीस्ती फुटून उधाणाचे पाणी शेत जमिनींमध्ये घुसून शेतकर्यांचे नुकसान होते. काही ठिकाणी शेतकरी आपल्या पध्दतीने खारबंदीस्तीे दुरूस्ती करतात. परंतु या मोठ्या खारबंदीस्ती असल्यामुळे त्यांच्या दुरूस्तीचा खर्च शेतकर्यांना परवडणार नाही. त्यांची दुरूस्ती करायला हवी. अलिबाग तालुक्यातील खारबंदीस्ती फुुटत असतात. शेतकरी त्यांना जमेल तसे त्या दुरूस्त करत असतात.
मानकुळे,कावाडे,शहापूर, बहिरीचापाडा येथील खारबंदीस्ती फुटून उधाणाचे पाणी शेत जमिनीमध्ये घुसत असते. धेरेंड-शहापूर परिसरातील काही शेतकर्यांनी 12 वर्षापूर्वी विद्युत प्रकल्पासाठी आपल्या जमीन विकल्या होत्या. त्या जमिनी एमआयडीसीकडे वर्ग झाल्या. त्यामुळे येथील खारबंदिस्तीची दुरुस्ती करण्यात आलेली नाही.
खारबंदिस्तीची दुरुस्ती न केल्यामुळे धेरंड, मोठे शहापूर, धाकटे शहापूर या तिन्ही गावांना समुद्राच्या भरतीचा पाणी घुसल्याने ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जर हीच परिस्थिती राहिली तर गावात उधाणाचे पाणी यापुढेही शिरत राहणार. खारबंदिस्ती फुटण्याची अनेक कारणे आहेत. या बंदिस्ती फार वर्षांपूर्वी बांधलेल्या आहेत. त्यामुळे त्या फुटतात. त्याचबरोबर समुद्रात व खाड्यांमध्ये होत असलेल्या भरावांमुळे पाण्याची पातळी वाढते. पाण्याच्या प्रवाहामुळे खारबंदीस्ती फुटते.खेकड्यांनी खोदलेल्या बिळांमध्ये पाणी घुसल्यामुळे खारबंदीस्ती फुटते. पुढील धोका विचारात घेऊन राज्य शासनाने खारबंदीस्तीची कामे केली पाहिजेत. जिथे आवश्यक आहे तिथे नवीन बांधबंदिस्ती केली पाहिजे. ज्या ठिकाणी बांधबंदिस्तीची दुरूस्ती होण्यासारखी आहे तेथे तातडीने दुरूस्तीची कामे करायला हवीत. त्यामुळे पुढील धोका टाळता येईल. उधाणाचे पाणी घरात घुसून नुकसान झाल्यास किंवा शेतीचे नुकसान झाल्यास नैसर्गिक आपत्ती म्हणून नुकसानभरपाई दिली जात नाही. ती मिळावी अशी येथील शेतकर्यांची मागणी आहे. तीचा विचार आता तातडीने व्हायला हवा.
-प्रकाश सोनवडेकर, खबरबात