कर्जत : प्रतिनिधी
दोन वर्षांच्या कोरोना संकटानंतर यंदा जल्लोषात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी भाविक सज्ज झाले आहेत. पूर्वी जशी मूर्ती मूर्तिकार देत असत त्याची भाविक मनोभावे प्राणप्रतिष्ठा करीत असत, परंतु नव्या पिढीचे सारे औरच असते. आता प्रत्येकाला गणेशमूर्ती सजवलेली हवी असते. या मूर्तींना मागणी वाढत आहे.
कोरोना संकटकाळात सगळ्यावर निर्बंध होते. दोन वर्षे गणेशोत्सवसुद्धा साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. यंदा निर्बंध पूर्णपणे शिथिल झालेले आहेत. इतकेच नव्हे तर गणेशमूर्तीच्या उंचीचीही मर्यादा नसल्याने भाविक यंदा गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्याच्या तयारीत आहेत. पूर्वी घरातील मोठी माणसे गणेशोत्सवाची संपूर्ण जबाबदारी घेत असत. आता काळ बदलल्याने ही जबाबदारी तरुणवर्गाकडे आली आहे.
थर्माकोलवर बंदी असल्याने कागद, पुठ्ठा, कुंड्या अशा पर्यावरणाचा समतोल राखणार्या वस्तूंपासून आरास करण्यासाठी तरुणाई पुढे येत आहे. पूर्वी घरीच कागदी फुले किंवा कागदावर कोरीव काम करून सजावट करण्यात येत असे. आता बाजारात आयत्या सजावटी मिळत आहेत. विविध वस्तूंचा वापर करून तयार केलेल्या सजावटीसाठीच्या वस्तू उपलब्ध असल्याने त्याचा वापर जास्त होतो. त्यातच पूर्वी मूर्तीकार देईल ती मूर्ती घरी आणून पुजली जायची. आता ती मूर्तीसुद्धा अगदी कापडाचे धोतर, शेला, हिरे, मुकुट असलेली असावी असे अगदी सर्वसामान्य भाविकालाही वाटते. त्यामुळे अशा मूर्तींची मागणी वाढली आहे.
Check Also
आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश
पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …
RamPrahar – The Panvel Daily Paper