नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
श्रीलंकेत झालेल्या मशिदीवरील हल्ल्यानंतर श्रीलंकन सरकारने व्हॉट्सअॅप, फेसबुक, यू ट्यूबसारख्या सोशल मीडियावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. हल्ल्यानंतर सरकारने रविवारी चिलाऊसह अन्य ठिकाणी कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेतला होता.
फेसबुकवर एका व्यक्तीने आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यानंतर चिलाऊ भागातील मुस्लिम- ख्रिस्ती समाजात दंगे उसळले होते. संबंधित व्यक्तीने टाकलेली पोस्ट धमकीची असल्याची धारणा येथील लोकांत झाल्यामुळे हे दंगे उसळल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले. यानंतर जमावाने तीन मशिदी व मुस्लिम नागरिकांच्या दुकानांवर दगडफेक केली. यानंतर संबंधित परिसरात कर्फ्यू लावण्यात आला, तसेच सोशल मीडियावरही बंदी घालण्यात आली.
दरम्यान, फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणार्या व्यक्तीला अटक करण्यात आल्याची माहिती श्रीलंकन पोलिसांनी दिली. सोशल मीडियाद्वारे जहाल विचार मांडणार्या एका मौलवीसही अटक करण्यात आली. कर्फ्यूच्या कालावधीत अनुचित घटना न घडल्याने परिस्थिती नियंत्रणात आहे. त्यामुळेच चिलाऊ व अन्य ठिकाणी लावण्यात आलेला कर्फ्यू सोमवारी पहाटे हटवण्यात आला आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper