उरण : वार्ताहर
मुंबईत झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर दरवर्षी पोलीस यंत्रणेकडून सागरी सुरक्षा कवच अभियान राबविण्यात येते. यावर्षी मंगळवारी (दि. 15) या अभियानाला सकाळी सुरुवात झाली. या अभियानात उरणमधील सर्व सागरी किनार्यावर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे उरण तालुक्यातील हद्दीत प्रवेश करणार्यांची ही पोलिसांकडून तपासणी केली जात आहे. यामध्ये प्रामुख्याने मुंबई मोरा व अलिबागमधील रेवस ते करंजा या दोन्ही जलमार्गावरील प्रवाशांची तपासणी केली जात आहे. यामध्ये मुंबईवरून उरणला येणार्या व मुंबईत जाणार्या प्रवाशांची पोलिसांकडून तपासणी केली जात आहे. या मोहिमेत पोलिसांकडून यंत्रणेची तपासणी करण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येते. मुंबई शेजारी असलेले उरण हे सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे, कारण मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर उरणच्या किनार्यावर कोंबिग ऑपरेशन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे देशातील ओएनजीसी, भारत पेट्रोलियम व तेल आणि ज्वलनशील पदार्थाची साठवणूकची स्थळे असलेले हा संवेदनशील भाग आहे. त्यामुळे सागरी सुरक्षा कवच अभियान हे उरणसाठी महत्त्वाचे आहे. या अभियान अंतर्गत ठिकठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.यात घारापुरी येथील राज बंदर जेट्टी येथे एक अधिकारी व सहा कर्मचारी, शेतबंदर जेट्टी येथे एक अधिकरी व पाच कर्मचारी, केगाव लॅन्डींग पॉइंट येथे एक अधिकारी व चार कर्मचारी, मरीन सोलुशन येथे दोन कर्मचारी, नवीन मरीन येथे दोन कर्मचारी, हनुमान कोळीवाडा येथे आठ कर्मचारी, मोरा ऑपरेशन दोन कर्मचारी असा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मोरा जेट्टी येथे मुंबई (भाऊचा धक्का) येथून येणार्या बोटीतून येणार्या प्रवाशांचे समान सामुग्री, तपासून त्यांच्या विषयी चौकशी करण्यात आली. प्रवाशांचे ओळखपत्र व इतर माहीत घेण्यात आली. कुठलीही संशयित व्यक्ती किंवा वस्तू अथवा बोट आढळल्यास माहिती मोरा सागरी पोलीस ठाण्यास देण्यात यावी, असे आवाहन मोरा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी केले आहे.