अलिबाग : प्रतिनिधी
वाहन चोरी करणारी एक आंतरराज्यीय टोळी रायगड पोलीसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेशण विभागाने जेरबंद केली आहे. या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 30 लाख रुपये किमती एकूण 12 वाहने पोलीसांनी जप्त केली आहे. या टोळीला जेरबंद केल्यामुळे राज्यभरातील विवीध भागातील 12 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलीसांना यश आले आहे.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. 17 ऑक्टोबर रोजी महाड तालुक्यातील नाडघर येथून पेट्रोल पंपाजवळून आयशर कंपनीचा एक टेम्पो चोरीला गेला होता. या प्रकरणी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात भादवी कलम 379 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकरणांचा सखोल तपास करण्याचे निर्देश पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेशण विभागाला दिले होते. गुन्ह्यांच्या तपासावर स्वतः अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे लक्ष ठेऊन होते.
या पार्श्वभुमीवर स्थानिक गुन्हे अन्वेशण विभागाचे प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी दोन तपास पथकांचे गठन केले होते. दोन्ही पथकांनी गुन्ह्याच्या अनुशंगानी निरनिराळ्या बाजूंनी तपास सुरु केला होता. तपासादरम्यान पोलीस हवालदार अशोक हंबीर यांना या गुन्ह्यातील आरोपी कोल्हापूर, सातारा आणि कर्नाटक जिल्ह्यातील असलेल्याची खबर मिळाली. या माहितीच्या आधारे तपासाची चक्र फिरवून सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश कदम, पोलीस उपनिरिक्षक विकास चव्हाण यांनी मारुती तातोबा तेऊरखाडकर, कोल्हापूर. अक्षय जयकर पवार सातारा, करीम शरीफ मोहीमुद्दीन शेख उर्फ भाईजान तुमकर कर्नाटक या तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 30 लाख 10 हजार रुपये किमतीची 12 वाहने पोलीसांनी जप्त करण्यात आली. यात 11 टेम्पो आणि 1 पल्सर मोटर सायकलचा समावेश आहे.
या टोळीने राज्यातील विवीध भागात अशाच पध्दतीने वाहन चोर्या केल्याचेही निष्पन्न झाले आहे. रायगड जिल्ह्यातील महाड, वडखळ, रबाळे एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील येथील पाच, कोपर खैराणे, मुलूंड आणि अकोला येथील प्रत्येकी एक तर खानवेल सिल्वासा आणि झलकी विजापूर कर्नाटक येथील प्रत्येकी एक असे एकुण 12 गुन्हे उघडकीस आले आहेत. तीनही आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत.
या गुन्ह्याच्या तपासात पोलीस निरीक्षक दयानंद गावडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश कदम, पोलीस उपनिरीक्षक विकास चव्हाण, सहाय्यक फौजदार दिपक मोरे, पोलीस हवालदार प्रशांत दबडे, अमोल हंबीर, जितेंद्र चव्हाण, अक्षय सावंत, मोरेश्वर ओमले, अक्षय जगताप, सायबर सेलचे तुषार घरत, अक्षय पाटील यांनी महत्वाचे योगदान दिले आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper