‘गिरीप्रेमी’ने रचला इतिहास


पुणे ः प्रतिनिधी
पुण्यातील 10 गिर्यारोहकांनी जगातील तिसरे आणि भारतातील सर्वात उंच कांचनजुंगा शिखर सर करीत तिरंगा फडकावला आहे. गिर्यारोहक उमेश झिरपे यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील 10 जणांच्या संघाने काल सकाळी दहाच्या सुमारास ही अभिमानास्पद कामगिरी केली. आठ हजार 586 मीटर उंच असलेले माऊंट कांचनजुंगा उंचीनुसार जगातील तिसरे, तर भारतातील पहिले शिखर आहे.
माऊंट कांचनजुंगा शिखरावर आतापर्यंत 400 गिर्यारोहकांनी झेंडा फडकावला आहे. कांचनजुंगा शिखर चढणे हे तांत्रिकदृष्ट्या अवघड असते. आशिष माने, रूपेश खोपडे, भूषण हर्षे, आनंद माळी, प्रसाद जोशी, कृष्णा ढोकले, डॉ. सुमित मांदळे, विवेक शिवदे, किरण साळस्तेकर आणि जितेंद्र गवारे या गिरीप्रेमींनी शिखराची चढाई केली आहे. ही भारतातील सर्वात मोठी नागरी मोहीम ठरली आहे. पर्यावरण संवर्धनाचे संशोधन करण्यासाठी आवश्यक असलेले नमुने (अतिउंचावरील माती आणि दगड) या मोहिमेत गोळा करण्यात आले.
गिर्यारोहक उमेश झिरपे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी झालेली ही सातवी अष्टहजारी मोहीम आहे. याआधी माऊंट एव्हरेस्ट, माऊंट ल्होत्से, माऊंट मकालू, माऊंट धैलागिरी, माऊंट मनास्लुवर आणि माऊंट च्यो ओयु मोहिमा फत्ते करण्यात आल्या आहेत. सातवी अष्टहजारी मोहीम फत्ते करणारे उमेश झिरपे भारतातील एकमेव गिर्यारोहक नेते आहेत.
RamPrahar – The Panvel Daily Paper