Breaking News

उल्हास नदीकिनारा होतोय हिरवागार

निर्मल जल अभियानातर्फे वृक्षलागवड व संवर्धन

कर्जत ः प्रतिनिधी
उल्हास नदी निर्मल जल अभियानातर्फे कर्जत उल्हास नदीकिनारी संत तुकाराम घाट आणि संत ज्ञानेश्वर घाटावर वृक्षलागवड करून गेल्या पावणेचार वर्षांपासून त्यांचे संवर्धनाचे काम अभियानातर्फे करण्यात येत आहे. त्यामुळे नदीकिनारा आता हिरवागार दिसत असून कर्जतकरांमधून समाधान व्यक्त होत आहे. आत्तापर्यंत संस्थेने तसेच कर्जतमधील अनेक नागरिकांनी विविध प्रकारची झाडे संस्थेला दिली, काही जणांनी स्वतः येऊन रोपण केली. ती रोपे संस्थेने आणि नागरिकांनी जोपासली आहेत. 2019 ते 2022 या दरम्यान आलेल्या दोन वेळच्या पावसाळ्याच्या पुरात काही झाडे वाहून गेली तर काही झाडे जागेवरच आडवी झाली होती. ती संस्थेतर्फे मशागत करून पुन्हा उभी करण्यात आली आहेत. सध्या उल्हास नदीकिनारी असलेल्या छोट्या आणि मोठ्या पण महत्वाची वड पाच, जांभूळ दहा, पिंपळ चार, कडुनिंब तीन, कदंब चार, आंबा सात, मोहगनी एक, नारळ दोन, हरडा एक, कांचन एक, पेरू दोन, सीताफळ एक, ताम्हण दोन, फणस चार, खोया एक, बेल एक, उंबर दोन, बहावा एक अशा एकूण 52 झाडांचा समावेश आहे. याशिवाय तुळस, दुर्वा, सदाफुली, तगर, डबल तगर, जास्वंदी, पारिजात, तीन रंगाच्या गुलबाक्षी अशी फुलझाडे जतन केली आहेत.
गेल्या वर्षी संस्थेतर्फे आंब्याच्या कोयी देण्याचे नागरिकांना आवाहन केले होते. त्यास उत्तम प्रतिसाद मिळाला त्याचे फलित म्हणून शेकडो आंब्याची रोपे दिसून येत आहेत. या वृक्ष संपदेची फळे आपल्याला काही वर्षात मिळण्यास सुरुवात होईल. या वृक्षराजीमुळे आपल्याला मिळणारा ऑक्सिजन हा सर्वात मोठा फायदा. याच जोडीला नदी किनारा सुरक्षित राहील. याच अनुषंगाने हे नदी किनारे स्वच्छ करण्यासाठी सुध्दा संस्थेचा अभियातून प्रयत्न असतो असे सदस्यांनी या वेळी बोलताना सांगितले.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply