नवी मुंबई ः बातमीदार
रस्ते अपघातामध्ये चारचाकी वाहनांतील एअर बॅगमुळे प्रवाशांना इजा न होता त्यांचे प्राण वाचतात, परंतु चारचाकी वाहनाप्रमाणे दुचाकी वाहनांसाठी अशी सुरक्षा प्रणाली असण्याची गरज सर्व स्तरातून होत होती. नवी मुंबईच्या दोन शाळकरी विद्यार्थ्यांनी यावर संशोधन करून दुचाकीसाठी एअर बॅग तयार केली आहे. त्यांच्या या संशोधनाचे कौतुक होत आहे.
एलेश माला व रत्नेश गिलाके हे सानपाडा येथील नवी मुंबई पालिकेच्या 18 नंबर शाळेत शिकतात. या दोन विद्यार्थ्यांनी दुचाकीसाठी एअर बॅग सादर केली आहे. एलेश व रत्नेश यांच्या या संकल्पनेला अॅमेझॉन वेब सर्व्हिसच्या (एडब्ल्यूएस) थिंक बिग सायन्स कार्निव्हल 2022-2023 चे प्रथम परितोषिक ही मिळाले आहे. इ. 7 वीमधील या दोघांनी सादर केलेल्या या एअर बॅगमध्ये एक सेन्सर बसवले आहे. जर दुचाकीवर कोणतीही वस्तू आपटली किंवा दुचाकी कोणत्याही वाहनास अथवा दुचाकीची धडक पडल्यास बॅगमधील हा सेन्सर सक्रिय होऊन एअर बॅग उघडली जाते. त्यामुळे दुचाकीस्वाराला गंभीर इजेपासून संरक्षण मिळते. हे संशोधन दुचाकीस्वारांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. ही बॅग गर्दीत व्यक्तीच्या सामानाचे चोरीपासून संरक्षण करू शकते, तसेच या बॅगमध्ये सौरचॅनल आहे, ज्याचा वापर हा आपत्कालीन परिस्थितीत बॅटरी व मोबाइल फोन चार्ज करण्यासाठी केला जाऊ शकतो. जोडीला या बॅगमध्ये एकात्मिक छत्रीचा ही समावेश आहे. अशा या बहुद्देशीय बॅगचे देशभरात कौतुक होत आहे.
Check Also
लोकनेते दि. बा. पाटील यांना रक्तदानातून आदरांजली
पनवेलमध्ये शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल उरण आगरी समाज मंडळाच्या वतीने शेतकरी, कामगार …
RamPrahar – The Panvel Daily Paper