Breaking News

राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेत ’दीपावली’, तर जिल्हास्तरीय स्पर्धेत ’साहित्य आभा’ मानकरी

आमदार प्रशांत ठाकूर यांनी निकाल केला जाहीर

पनवेल : रामप्रहर वृत्त
शैक्षणिक, सामाजिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणारे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या 22व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेत ’दीपावली’ अंकाने तर रायगड जिल्हास्तरीय स्पर्धेत ’साहित्य आभा’ हा दिवाळी अंक प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकाचे मानकरी ठरले आहेत, अशी माहिती श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सोमवारी (दि. 10) पनवेल येथे पत्रकार परिषदेत दिली.
पनवेल शहरातील मार्केट यार्ड मधील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या या पत्रकार परिषदेस मंडळाचे उपाध्यक्ष अरुणशेठ भगत, स्पर्धेचे संयोजक दीपक म्हात्रे, माजी नगरसेवक अनिल भगत आदी उपस्थित होते.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले की, सन 2022च्या अर्थात 22व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेत ’दीपावली’ या अंकाने प्रथम क्रमांक पटकार्ळींत सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक होण्याचा सन्मान पटकाविला आहे. ’पद्मगंधा’ अंकाने द्वितीय, तर ’दै. उद्याचा मराठवाडा मुक्तपर्व’ अंकाने तृतीय क्रमांक प्राप्त केला. सर्वोत्कृष्ट विशेषांक होण्याचा मान ’सकाळ स्वराभिषेक’ अंकाने, सर्वोत्कृष्ट बाळ साहित्य अंक ’वयम’, उत्कृष्ट दिवाळी अंक म्हणून ’आंतरभारती’, उत्कृष्ट कथेचे बक्षीस अक्षर दिवाळी अंकातील ’काम तमाम वाघा बॉर्डर’ या लेखक सतीश तांबे यांच्या कथेने, उत्कृष्ट कविता ’वाघूर’ दिवाळी अंकातील कवी विनय पाटील यांच्या एक थोराड झाड या कवितेने, उत्कृष्ट मुखपृष्ठ ’उत्तम अनुवाद’ दिवाळी अंकाने व उत्कृष्ट व्यंगचित्र ’मार्मिक’ अंकातील गौरव सर्जेराव यांच्या व्यंगचित्राने पटकाविले आहे. याशिवाय सर्वोत्कृष्ट लेख ‘कालनिर्णय’ दिवाळी अंकातील निळू दामले यांच्या विल्यम शॉन या लेखाने, लक्षवेधी परिसंवाद ‘अंतरीचे प्रतिबिंब’ दिवाळी अंकातील अक्षय ऊर्जाने, लक्षवेधी मुलाखत (दिलीप माजगावकर, संवादक दिलीप प्रभावळकर-‘शब्दमल्हार’ दिवाळी अंक) अशी परीक्षकांनी निवड केली असून 2022मध्ये शतकोत्सव साजरा करणार्‍या ’मौज’ दिवाळी अंकाचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
रायगड जिल्हास्तरीय स्पर्धेत ’साहित्यआभा’ अंकाने प्रथम क्रमांकाचा मान मिळविला आहे. द्वितीय क्रमांक ’दैनिक किल्ले रायगड’ अंकाने, तृतीय क्रमांक ’आगरी दर्पण’ अंकाने, उत्तेजनार्थ बक्षीस ’साप्ताहिक माणगंगा’ आणि ’साप्ताहिक कोकणनामा’ अंकांनी पटकाविले आहे. उत्कृष्ट कथा ’दि म्हसळा टाइम्स’मधील सु. पुं. अढाऊकर यांच्या खारे बिस्कुट कथेने, उत्कृष्ट कविता सा. ‘कोकणनामा’मधील मनश्री उल्हास पवार यांच्या आई-बाबा कवितेने, तर उत्कृष्ट व्यंगचित्र ‘साहित्य आभा’ अंकातील व्यंगचित्रकार विवेक मेहेत्रे यांच्या व्यंगचित्राने पटकाविले. राज्यभरातून उदंड प्रतिसाद लाभलेल्या या स्पर्धेसाठी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. विजय तपास, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव व कवियत्री चित्रकार मिनाक्षी पाटील, सुप्रसिद्ध सुलेखनकार सुनील धोपावकर यांनी परीक्षक म्हणून जबाबदारी बजावली, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले.
राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेमधील विजेत्या प्रथम क्रमाकांस एक लाख रुपये, व्दितीय क्रमाकास 50 हजार व तृतीय क्रमाकांस 30 हजार रुपये तसेच आकर्षक सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट विशेषांकासाठी 15 हजार रुपये, बालसाहित्य अंकासाठी 7500 रुपये, उत्कृष्ट दिवाळी अंकासाठी 15 हजार रुपये, उत्कष्ट कथा, उत्कृष्ट कविता, उत्कृष्ट मुखपृष्ठ व उत्कृष्ट व्यंगचित्रासाठी प्रत्येकी तीन हजार रुपये त्याचबरोबर सर्व विजेत्यांना सन्मानचिन्ह तसेच रायगड जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकास 40 हजार रुपये, व्दितीय क्रमांकास 20 हजार रुपये आणि तृतीय क्रमाकांस 10 हजार रुपये, दोन उत्तेजनार्थ प्रत्येकी पाच हजार रुपये आणि उत्कृष्ट कथा, उत्कृष्ट कविता व उत्कृष्ट व्यंगचित्रासाठी प्रत्येकी तीन हजार रुपये आणि सर्व विजेत्यांना सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते येत्या मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आयोजित करण्यात येणार्‍या समारंभात सन्मानित करण्यात येणार आहे.
दिवाळी अंक ही महाराष्ट्राची पूर्वापार चालत आलेली एक सांस्कृतिक परंपरा आहे. ही परंपरा अखंडपणे चालू राहावी व त्यातून दर्जेदार दिवाळी अंकांची निमिर्ती व्हावी यासाठी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या वतीने महाराष्ट्रातील सर्वांत मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचे आयोजन करण्यात येते आणि या स्पर्धेला राज्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतो. कितीही संकटे आली तरी दिवाळी अंकाच्या 112 वर्षांच्या परंपरेत खंड पडलेला नाही. वाचकांची संख्या घटत आहे, अशी ओरड दरवर्षी होते, मात्र तसे न होता दर्जेदार साहित्यामुळे दिवाळी अंकांना मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ही अंक निर्माते, साहित्य दर्दी वाचकांसाठी सुखावह बाब असून साहित्य परंपरा अखंडित ठेवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी या वेळी आश्वासित केले.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply