Breaking News

मावळ लोकसभा मतदारसंघात भाजपचे महाजनसंपर्क अभियान

पनवेल : रामप्रहर वृत्त
देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारकडून नऊ वर्षांत समाजातील सर्व घटकांसाठी कल्याणकारी कार्य करण्यात आले. देशातील 80 कोटी गरिबांना दरमहा धान्य, चार कोटी कुटुंबांना घरे, पाच कोटी नागरिकांना मोफत उपचार, ग्रामीण भागात 12 कोटी घरांमध्ये पाणी देण्याबरोबरच फेरीवाले, नवउद्योजक, विद्यार्थ्यांसह परदेशस्थ भारतीयांच्या अडचणीवेळीही केंद्र सरकार पाठीशी राहिले आहे. त्या अनुषंगाने मावळ लोकसभा मतदारसंघात महाजनसंपर्क अभियान आयोजित करण्यात आल्याची माहिती राज्याचे माजी मंत्री, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष व मावळ लोकसभा अभियान प्रमुख संजय उर्फ बाळा भेगडे यांनी सोमवारी (दि. 5) पनवेल येथे आयोजित पत्रकार परिषेदत दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत. भाजपातर्फे राबविण्यात येणार्‍या मोदी ऽ 9 कार्यक्रमांतर्गत केंद्र सरकारच्या लोककल्याणकारी कार्याची माहिती देण्यासाठी भाजपच्या पनवेल येथील मध्यवर्ती कार्यालयात पत्रकार परिषद झाली. या वेळी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, आमदार उमाताई खापरे, ज्येष्ठ नेते बाळासाहेब पाटील, शंकर जगताप, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, वैशाली डहाळे, शंकर भोईर, अविनाश कोळी, चंद्रकांत नखाते, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील, भाजप जिल्हा संघटन सरचिटणीस दीपक बेहेरे, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, ओबीसी सेलचे राजेश गायकर आदी उपस्थित होते.
संजय भेगडे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना पुढे सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून समाजातील प्रत्येक घटकाला दिलासा दिला गेला. कोरोना आपत्तीत संकटात कोणीही उपाशी राहू नये यासाठी 80 कोटी गरीबांना मोफत अन्नधान्य दिले गेले, तर कोरोनाला हरविण्यासाठी 220 कोटी डोस मोफत दिले गेले. जगातील सर्वांत मोठा आरोग्यसेवा कार्यक्रम आयुष्यमान भारत अंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार आणि त्या माध्यमातून आतापर्यंत तब्बल पाच कोटी नागरिकांवर उपचार करण्यात आले आहेत. ग्रामीण भागातील नऊ कोटी 60 लाख कुटुंबांपर्यत मोफत गॅस, देशातील एक लाख फेरीवाल्यांना कर्ज उपलब्ध करून दिले गेले. त्याचबरोबर राष्ट्रीय सुरक्षा सर्वोच्च मानून अत्याधुनिक उपकरणांसह सशस्त्र दलांना सक्षम केले, देशाच्या विकासासाठी पायाभूत सुविधा भक्कम करण्यासाठी विविध योजना अमलात आणल्या तसेच अयोध्येत भव्य श्रीराम मंदिर, वंचित घटकांसाठी साडेसात हजार कोटींचे कर्जवाटप करण्यात आले. प्रधानमंत्री स्वनिधी योजनेंतर्गत पाच हजार 182 कोटी रुपये, लाभार्थीच्या थेट खात्यात 29 लाख कोटी रुपये देण्यात आले.
केंद्र सरकारकडून थेट अनुदान मिळत असल्यामुळे भ्रष्टाचार बंद झाला. डिजिटल भारत क्रांती, आत्मनिर्भर भारत, पीएम किसान योजनेंतर्गत प्रत्येक शेतकर्‍याच्या खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये, बियाणे खरेदीसाठी कर्जाची गरज नाही, स्टँड अप-स्टँड अप इंडिया योजनेंतर्गत वंचित घटकांतील एक लाख 80 हजार नवउद्योजकांना 40 हजार 700 कोटी मंजूर केले. देशातील नवोदित होतकरू खेळाडूंसाठी खेलो इंडिया उपक्रम, जनऔषधी केंद्रांमधून स्वस्त औषधांच्या माध्यमातून 20 हजार कोटींची बचत, 34 कोटींहून अधिक सॅनिटरी पॅडचे एक रुपयात वितरण आणि पीएम मातृ वंदना योजनेंतर्गत तीन कोटी तीन लाखांहून अधिक महिलांना मदत दिली गेली तसेच स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून 12 कोटी शौचालयांचे निर्माण, अशी विविध लोकोपयोगी योजना देशातील नागरिकांना देत त्यांची यशस्वीपणे अंमलबजावणीही करण्यात आली, अशीही माहिती संजय भेगडे यांनी या वेळी दिली. त्याचबरोबर देशाच्या विकासासाठी घेतलेल्या अनेक निर्णयांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारचे आभार मानण्यात आले.
मोदी ऽ 9 कार्यक्रमांतर्गत मावळ लोकसभा मतदारसंघात महाजनसंपर्क अभियानाच्या अनुषंगाने, मोदी सरकारच्या काळात झालेल्या विकासकामांची माहिती देण्यासाठी विकास तीर्थ, डॉक्टर, शिक्षक, वकील, इंजिनिअर यांचे प्रबुद्ध नागरी संमेलन, प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मोदी सरकारला सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठिंबा देणार्‍यांचे सोशल मीडिया इन्फ्ल्यून्सर संमेलन, विशाल रॅली, जाहीर सभा, योग दिन, ज्येष्ठ कार्यकर्ता संमेलन, लाभार्थी संमेलन, व्यापारी संमेलन, व्हर्च्युअल रॅली, घरोघरी संपर्क अभियान, संयुक्त मोर्चा संमेलन असे विविध कार्यक्रम होणार असल्याचेही संजय भेगडे यांनी सांगितले. त्याचबरोबर मावळ, पिंपरी चिंचवड परिसरात केंद्राच्या माध्यमातून झालेल्या विकासकामांचा आढावा त्यांनी मांडला.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की, या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की, कार्यक्षम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या अनुषंगाने मोदी ऽ 9 महासंपर्क अभियान अंतर्गत सेलिब्रेशनऐवजी नागरिकांशी कम्युनिकेशन असे कार्यक्रमे आयोजित करण्यात आले आहेत. मागील नऊ वर्षांत आपण अतिशय गतिमान सरकार पाहिले, प्रचंड विकासात्मक कामे पहिली. विविध योजनांच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकाला मदत करून विकासाच्या प्रवाहात आणण्याचे काम केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पारदर्शक, भ्रष्टाचारमुक्त कारभार देशातील जनतेने पाहिला. त्याची फलश्रुती म्हणून भारताची प्रतिमा जगात उंचावत आहे. मोदी सरकारने आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून गरीब कल्याणाचे विविध आयाम तयार करून त्यांचे अधिकार त्यांना पोहचविण्याचे काम केले. गाव, शहराची देशात आणि देशाची जगात एक वेगळी ओळख मागील नऊ वर्षांत मोदीजींच्या नेतृत्वात झाली आहे.
पनवेल-उरण परिसरातील विकासकामांचा आढावा सादर करताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी, केंद्र सरकारमुळे विमानतळाच्या कामाला वेग, मुंबई ट्रान्सहार्बर लिंक एमटीएचएल, नेरुळ ते खारकोपर रेल्वे नंतर पुढे उरणपर्यंत रेल्वे धावण्यासाठी सज्ज, मुंबई-वडोदरा एक्स्प्रेस हायवे, दिल्ली-मुंबई हायवे जेएनपीटीला जोडण्याचे काम, जलजीवन मिशन अंतर्गत गाव-खेड्यापाड्यांत पाणीपुरवठा योजना तसेच राज्य सरकार, एमएमआरडीए, महापालिका यांच्या माध्यमातून प्रचंड विकासकामांमुळे पनवेल, उरण परिसराचे चित्र बदलत असल्याचे अधोरेखित केले.
प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांनी सांगितले की, आपण सर्वांनी 2004 ते 2014पर्यंत युपीए सरकार पाहिले. जनतेच्या हिताची कामे न करणे हे त्यांचे महत्त्वाचे काम होते. कामचुकारपणा करणे हीच त्यांची नीती व धोरण होते. मोठ्या प्रमाणात घोटाळे हे आपण युपीए सरकारच्या कार्यकाळात झालेले आपण पाहिलेले आहे. या युपीए सरकारच्या घोटाळ्यांना कंटाळून 2014मध्ये जनतेने ठरवले आणि मोठ्या प्रमाणात समर्थन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जनतेने दिले. मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याने या काळात झालेल्या कामांची माहिती देण्यासाठी 30 मे ते 30 जूनपर्यंत महाजनसंपर्क अभियान आयोजित करण्यात आले आहे.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply