Breaking News

आमदार प्रशांत ठाकूर व पत्नी वर्षा ठाकूर यांचा अवयवदान संकल्प

सरकारी अभियानात ऑनलाईन नोंदणी; लोकप्रतिनिधींसमोर ठेवला आदर्श

पनवेल : रामप्रहर वृत्त
मानवता हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे हे सिद्ध करणारी कृती म्हणजे अवयवदान. याच भावनेतून पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि त्यांच्या पत्नी वर्षा ठाकूर यांनी मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प केला. त्यांनी केंद्र सरकारच्या अभियानामध्ये ऑनलाइन नोंदणी करून एक आदर्श वस्तुपाठ ठेवला आहे. त्याचबरोबर इतरांनासुद्धा अशाच प्रकारे अवयवदानाबाबत त्यांनी आवाहन केले.
मृत्यू हे आपल्या आयुष्यातील चिरंतन सत्य आहे, जे कधीही बदलता येऊ शकत नाही. त्या अनुषंगाने आपण समाजातील अनेक गरजूंच्या आयुष्यात आनंद फुलवून त्यांचे जीवन प्रकाशमय करू शकतो. याची जाणीव फारच कमी लोकांना आहे. शरीर हे क्षणभंगूर आहे. मृत्यूनंतर सारे नष्ट होते, पण अवयवरूपी जिवंत रहायचे असेल तर अवयवदान सर्वात श्रेष्ठ पर्याय आहे. मृत्यूपश्चात एक देह सात जणांच्या आयुष्यात आशेचा किरण ठरू शकतो, तर 35 लोकांच्या आयुष्याचा दर्जा सुधारू शकतो, मात्र आपल्या समाजात अवयवदानाविषयी फारशी जागृती नसल्याने कित्येक रुग्ण वर्षानुवर्ष प्रतीक्षेत आहेत. अवयवदान हे केवळ डोळे किंवा किडनीपुरता मर्यादित नसून शरीराचे सुमारे 10 विविध अवयवदान करता येतात, पण त्याकरिता पुरेशी माहिती व इच्छाशक्ती नसते. त्यामुळे मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प करण्यास फारसे कोणी पुढे येत नाहीत, परंतु पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि त्यांच्या पत्नी वर्षा ठाकूर यांनी महत्त्वाचे पाऊल उचलत समाजापुढे आदर्श ठेवला आहे.
ठाकूर दाम्पत्याने भारत सरकारच्या pledge.mygov.in/organ-donation या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अवयवदानाची शपथ घेतली. मृत्यूनंतरदेखील आपण इतरांच्या कामी येऊ शकतो. आपल्या एका कृतीमुळे दुसर्‍या व्यक्तीचे जीवन सुखकर करीत त्याला नवीन जीवनदान देऊ शकतो या भावनेतून ठाकूर दाम्पत्याने पुढाकार घेतला.

आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी सीमेवर तैनात जवान स्वतःच्या प्राणांचे बलिदान देऊन हुतात्मा होतात. आज आरोग्य विज्ञानातील संशोधनामुळे एखादा सामान्य नागरिकही जीवनदानासारखे सर्वोच्च दान देऊन मृत्यूनंतरही आपल्या अवयवांच्या रूपाने अमर होतो. मानवता हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे, हे सिद्ध करणारी कृती म्हणजे अवयव दान. आज मी व पत्नी वर्षा हिने भारत सरकारच्या pledge.mygov.in/organ-donation या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अवयवदानाची शपथ घेतली. मृत्यूनंतरदेखील आपण इतरांच्या कामी येऊ शकतो, आपल्या एका कृतीमुळे दुसर्‍या व्यक्तीचे जीवन सुखकर करीत त्याला नवीन जीवनदान देऊ शकतो ही भावना अतिशय सुखदायी आहे. आपण सर्वही या कृतीसाठी पुढे या, अवयव दानाची शपथ घ्या आणि इतरांनाही याबाबत माहिती द्या.
-प्रशांत ठाकूर, आमदार

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply