Breaking News

मुंबई ऊर्जा प्रकल्प : शेतकर्‍यांचे समाधान झाल्यानंतरच काम करा! -मंत्री उदय सामंत

आमदार प्रशांत ठाकूर यांची शिष्टाई कामी! शनिवारी पाहणी व चर्चा

पनवेल : रामप्रहर वृत्त
मुंबई ऊर्जा प्रकल्पाच्या अनुषंगाने प्रत्यक्ष जागेवर पाहणी करून सर्वेक्षण, प्रकल्पबाधितांशी चर्चा आणि त्यांचे समाधान झाल्यावरच या प्रकल्पाचे काम सुरू करावे, असे निर्देश राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी व मुंबई ऊर्जा प्रकल्पाच्या अधिकार्‍यांना गुरुवारी (दि. 14) नागपूर येथे दिले.
मुंबई ऊर्जा मार्ग या प्रकल्पामुळे पनवेल तालुक्यातील वळवली, टेंभोडे, कोळवाडी आणि परिसरातील शेतकर्‍यांचे नुकसान होऊ नये यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांना निवेदन आणि त्या अनुषंगाने बैठकीची मागणी केली होती. या मागणीनुसार नागपूर येथे बैठक पार पडली. या बैठकीस आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार बाळाराम पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील थोरवे, ऊर्जा प्रकल्प अधिकारी निनाद पितळे, आर्किटेक अतुल म्हात्रे, कामगार नेते प्रकाश म्हात्रे, मारूती चिखलेकर, सचिन तांडेल, हेमराज म्हात्रे, विजय भोईर, विजय गडगे, राजेश भोईर, दीपक उलवेकर, भास्कर आगलावे, प्रमोद आगलावे, प्रशांत कडव यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
पनवेल तालुक्यातील विविध गावांमधून मुंबई ऊर्जा प्रकल्पाची वाहिनी टाकण्यात येणार असल्याने नवी मुंबई आणि परिसरातील लोकांचा लोडशेडींगचा प्रश्न निकाली लागणार असला तरी पनवेल तालुक्यात वारंवार होणार्‍या शासकीय प्रकल्पांसाठीच्या भूसंपादनामुळे येथील शेतकरी भूमिहीन होत चालले आहेत. अशा वेळेला शेतकर्‍यांच्या परंपरागत असलेल्या शेतजमिनी त्यांच्याकडून हिसकावून अथवा परिसरात निर्माण होणार्‍या विकासांच्या संधीचा हक्क त्यांच्यापासून हिरावून घेतला जात आहे आणि असे वारंवार घडत आहे. त्यामुळे येणारा प्रत्येक प्रकल्प हा देशासाठी, राज्यासाठी महत्त्वाचा असेल, पण त्यातून त्या शेतकर्‍यांना फायदा होतोच असे नाही आणि म्हणून हा प्रकल्प टेंभोडे, वळवली, कोळवाडी आणि अन्य परिसरातील ग्रामस्थांच्या जमिनींमधून जात असताना जर ठाणे जिल्ह्यामध्ये या प्रकल्पासाठी शेतकर्‍यांच्या जमिनीवरून वाहिनी न नेता ती वनखात्याच्या जमिनीतून नेण्याचा प्रस्ताव झाला आहे, तर तशाच पद्धतीने रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यामध्ये विशेषतः ज्या ठिकाणी मर्यादेपेक्षा खूप मोठ्या प्रमाणात भूसंपादन झालेले आहे अशा ठिकाणी हा पर्याय पडताळून पाहिला जात नाही? अशी व्यथा ग्रामस्थांच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आली आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकर्‍यांना होणारे संभाव्य नुकसान या बाबतीतसुद्धा शेतकरी (जमीन मालक) चिंतीत आहे आणि यामुळे या संदर्भामध्ये यापूर्वी या शेतकर्‍यांनी अनेक आंदोलने केलेली आहेत. अशाच पद्धतीचे आंदोलन अलिकडच्या काळात या परिसरातील ग्रामस्थांनी केले आहे. म्हणूनच या प्रकल्पाच्या संदर्भात मुंबई ऊर्जामार्फत ठाणे जिल्ह्याामध्ये अवलंबलेला मार्ग आणि पनवेल तालुक्यातील ग्रामस्थांची मागणी लक्षात घेता शेतकर्‍यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली होती.
या वेळी झालेल्या बैठकीच्या अनुषंगाने पालकमंत्री उदय सामंत यांनी या विषयाचे गांभीर्य लक्षात घेता भूमिपुत्रांच्या जमिनी बाधित होण्यापासून वाचवता येत असतील तर तसे प्रयत्नही करावेत, असे निर्देश देतानाच या संदर्भात गरज पडल्यास केंद्रीय हवाई खाते तसेच वनखात्याशी स्वतः चर्चा करण्याची तयारीही मंत्री उदय सामंत यांनी दर्शवली. या संदर्भातील तत्काळ सूचनेमुळे आणि या बैठकीच्या अनुषंगाने येत्या शनिवारी अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील थोरवे व ऊर्जा प्रकल्पाचे अधिकारी शेतकर्‍यांसोबत या प्रकल्पासंदर्भात पाहणी करणार आहेत आणि जोपर्यंत शेतकर्‍यांचे समाधान होत नाही तोपर्यंत येथील काम कार्यान्वित करून नये, असे निर्देश मंत्री उदय सामंत यांनी अधिकार्‍यांना दिले असून या बैठकीमुळे शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply