Breaking News

उरणच्या शेतकरी लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन

लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांची उपस्थिती

उरण : रामप्रहर वृत्त
उरण तालुक्यातील गौरवशाली आणि शौर्यशाली शेतकरी लढ्यात आपल्या प्राणांची आहुती देणार्‍या हुतात्म्यांना मंगळवारी (दि.16) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी जासई येथील स्मारकात अभिवादन केले. स्थानिक भूमिपुत्रांचे योग्य पुनर्वसन आणि रोजगाराचे प्रश्न मार्गी लागणे हीच प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत नेते दि.बा. पाटील आणि हुतात्म्यांना खरी आदरांजली असेल, असे मत या वेळी मान्यवरांनी व्यक्त केले.
शेतकरी व प्रकल्पग्रस्तांचे नेते स्व. दि. बा. पाटील यांच्या नेतृत्वात भूसंपादनाच्या विरोधात 16 व 17 जानेवारी 1984 रोजी शेतकरी लढा झाला होता. या लढ्यात 16 जानेवारी रोजी दास्तान फाटा येथे झालेल्या पोलिसांच्या गोळीबारात रघुनाथ अर्जुन ठाकूर (धुतूम) व नामदेव शंकर घरत (चिर्ले) या दोन शेतकर्‍यांना हौतात्म्य आले; तर आंदोलनाच्या दुसर्‍या दिवशी 17 जानेवारी रोजी नवघर फाटा येथे झालेल्या गोळीबारात कमलाकर कृष्णा तांडेल व महादेव हिरा पाटील व केशव महादेव पाटील या पिता-पुत्रांसह पागोटे येथील तीन शेतकरी हुतात्मा झाले. या आंदोलनात हजारो शेतकर्‍यांना कारावास झाला, लाठीमार सहन करावा लागला. याच आंदोलनातून देशातील शेतकर्‍यांना त्यांच्या संपादित जमिनीच्या बदल्यात विकसित जमीन देण्याचा कायदा झाला.
शेतकरी लढ्याला मंगळवारी 40 वर्षे पूर्ण झाली. या लढ्यात हौताम्य आलेल्या शेतकर्‍यांना दरवर्षी अभिवादन करण्यात येत असते. त्यानुसार यंदाही लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्यासह सर्वपक्षीयांनी अभिवादन केले. या कार्यक्रमाला आमदार जयंत पाटील, माजी आमदार बाळाराम पाटील, उद्योजक जे.एम.म्हात्रे, भाजपचे ज्येष्ठ नेते वाय.टी.देशमुख, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, जेएनपीए विश्वस्त रवींद्र पाटील, दिनेश पाटील, माजी विश्वस्त भूषण पाटील, कामगार नेते सुरेश पाटील, भाजपचे उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, पनवेल-उरण आगरी समाज मंडळाचे अध्यक्ष अतुल पाटील, जासईचे सरपंच संतोष घरत, पागोटेेचे सरपंच कुणाल पाटील, पागोटे अध्यक्ष प्रकाश भोईर, माजी नगरसेवक राजू ठाकूर, विभागीय जिल्हा अध्यक्ष गोपी म्हात्रे, नीलकंठ घरत, शिवाजी भगत, सुधीर घरत, अ‍ॅड. जे.डी. तांडेल, नंदकुमार पटवर्धन, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, विनोद म्हात्रे, कामगार नेते जितेंद्र घरत यांच्यासह पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान, चिर्ले येथे हुतात्मा नामदेव शंकर घरत स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने आणि रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले होते. त्याचप्रमाणे लोकनेते रामशेठ ठाकूर आणि शेमटीखार श्रमिक कल्याणकारी सामाजिक संस्थेच्या वतीने धुतूम गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना स्कूलबॅगचे वाटप करण्यात आले; तर हुतात्मा रघुनाथ अर्जुन ठाकूर यांच्या कुटुंबियांच्या वतीनेही या शाळेत स्मृतीदिनानिमित्त खाऊचे वाटप करण्यात आले. या वेळी रेश्मा ठाकूर, विनोद ठाकूर, मेघनाथ ठाकूर, राजेश ठाकूर उपस्थित होते.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply