Breaking News

पंतप्रधानपदी मोदी, तर बारणे यांना खासदार बनवण्याचा गुजराती व राजस्थानी समाजाचा निर्धार

पनवेल ः रामप्रहर वृत्त

अबकी बार चारसो पार, फिर एक बार मोदी सरकार, श्रीरंग आप्पा बारणे तिसरी बार खासदार असा आश्वासक पाठिंबा विविध समाजांनी देत मताधिक्य देण्यासाठी रणशिंग फुंकले आहे. गुजराती व राजस्थानी समाजाची बैठक रविवारी (दि.28) खारघर येथे झाली. या दोन्ही समाजांनी पुन्हा पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी, तर श्रीरंग बारणे यांना खासदार बनवण्याचा निर्धार केला. पुन्हा मोदी सरकार केंद्रात येणार आहे आणि त्या अनुषंगाने सर्वसामान्य माणसाचा आणि देशाच्या विकासाचा आलेख आणखी उंचावणार आहे. त्यामुळे या विकासाचे साक्षीदार होण्यासाठी मतांची आघाडी देण्याचा निर्धार या वेळी या समाजांकडून करण्यात आला.
या बैठकीला भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आरपीआय, रासप, पीआरपी व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे, भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस शिवदास कांबळे, माजी महापौर कविता चौतमोल, शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रथमेश सोमण, गुजराती व राजस्थानी समाजाचे कांतीभाई पटेल, निलेश पटेल, कघ्घाभाई पटेल, अशोक पटेल, हसमुख पटेल, सुजाराम चौधरी, हक्काराम चौधरी, मोतीलाल जैन, विनोद बाफना, जे.पी. पटेल, देवजीभाई पटेल, दिनेश पटेल, आशिष पटेल, आर.पी. जैन, कमल कोठारी, संजय जैन, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष ब्रिजेश पटेल, सचिन शहा, अंजूबेन, प्रवीण बेरा, बिना गोगरी, कुणाल संघानी, हसमुख संघानी तसेच भाजपचे खारघर मंडल अध्यक्ष प्रवीण पाटील, विजय पाटील, दीपक शिंदे, प्रसाद परब, संध्या शारबिद्रे यांच्यासह गुजराती आणि राजस्थानी समाजाचे नेते कार्यकर्ते उपस्थित होते. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रूपात सक्षम नेतृत्व काम करीत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सरकार येण्यासाठी खासदार श्रीरंग बारणे यांच्या विजयाची हॅट्ट्रिक करणार असल्याची आश्वासक ग्वाही या बैठकीत समाजांनी दिली.
या वेळी बोलताना उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी म्हटले की, मी नऊ निवडणुका लढवल्या आहेत आणि प्रत्येक निवडणुकीत विजय मिळवला आहे. यंदा तुम्हा सर्वांच्या जोरावर खासदारकीची हॅट्ट्रिक होईल. दहा वर्षांत संसदेत फक्त मावळचे नाही, तर देशभरातील प्रश्न मांडले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली काम करीत असताना विकास काय असतो आणि कसा करायचा असतो हे जाणून घेतले आणि त्या अनुषंगाने जास्तीत जास्त काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. या अनुभवातून यापुढे यापेक्षाही जास्त काम करण्याचा निश्चय केला आहे. त्यामुळे मला पुन्हा एकदा संधी द्यावी. लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांचे सहकार्य मला कायम राहिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशाचा विकास होण्याबरोबरच देशाची संस्कृती आणि परंपरा वृद्धिंगत व संवर्धन करण्याचे काम झाले आहे तसेच भ्रष्टाचार संपवण्याचे काम केले आहे. म्हणून देशाच्या भविष्यासाठी पुन्हा मोदीजींना पंतप्रधान करा.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, समाजाचे प्रतिनिधित्व आणि सेवेचा वसा आहे. समाज उन्नतीसाठी आग्रही राहिलेल्या या समाजातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. वर्षभरात कोणतीही सुट्टी न घेता काम करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ देशाचाच नव्हे; तर संपूर्ण विश्वाचे गौरव आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघात 25 लाखांपेक्षा जास्त मतदार आहेत. त्यामुळे प्रत्येक घरोघरी उमेदवार पोहचणार नसले तरी प्रत्येक विभागात ते पोहचले आहेत. प्रत्येक निवडणुकीत या विभागाने मला मतांची आघाडी मिळवून दिली आहे. त्याचप्रमाणे महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांना मताधिक्य द्या, असे आवाहनही त्यांनी केले.
भाजपचे प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील यांनी म्हटले की, एकही दिवस सुट्टी न घेणारा जगातील एकमेव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रूपाने देशाला मिळाला आहे. सर्व समाज मोदीजींच्या पाठीशी उभा आहे याचा आपल्या सर्वांना अभिमान आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांना या विभागातून लीड मिळाला आहे आणि त्याच धर्तीवर आप्पा बारणे यांनाही मतांची आघाडी मिळणार आहे. हा विजय तीन लाख मतांच्या आघाडीने झाला पाहिजे यासाठी सर्वांनी प्रयत्नशील रहावे.

नरेंद्र मोदींनी पंतप्रधान म्हणून केलेले काम लक्षात घ्या. गोरगरीब जनतेसाठी, प्रत्येक समाजासाठी ते काम करीत आहेत. यापुढेही विकासाचा महामेरू सुरू ठेवण्यासाठी सज्ज रहा, ही संधी वाया घालू नका. नवमतदारांनाही माझे आवाहन आहे की, नवभारताचे साक्षीदार व्हा. आपल्या मताचा अधिकार बजवा.
-मोतीलाल जैन

देशात सर्वत्र होत असलेला विकास पाहता आपले मत 400 खासदार पार करण्यासाठी द्यायचे आहे. त्यासाठी जागरूक रहा. फिर एक बार मोदी सरकार आणायचे आहे.
-विनोद बाफना

आमदार प्रशांत ठाकूर नेहमीच समाजासोबत राहिले आहेत. मोदीजींनी जगात आपल्या देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांचे निर्णय जगात पुढे नेणारे आहेत. त्यामुळे आपल्या संघटन कौशल्याने मोहीम फत्ते करूया.
-कांतिभाई पटेल

सर्व देशाच्या अस्मितेसाठी देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींना, तर मावळ लोकसभा मतदारसंघातून खासदार श्रीरंग बारणे यांना विजयी करूया. आणि त्यासाठी सर्व समाज तुमच्या पाठीशी खंबीर आहे. आमच्या रक्तात कमळ आहे आणि आप्पा बारणे महायुतीचे उमेदवार आहेत. त्यामुळे ते प्रचंड मतांनी विजयी होतील.
-जे.पी. पटेल

आपल्या मतांची ताकद लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, खासदार श्रीरंग बारणे यांना विजयी करण्यासाठी उपयोगी आणूया. जिथे भाजप तिथे आम्ही, त्यामुळे आप्पा बारणे यांना जास्तीत जास्त मते मिळण्यासाठी प्रयत्नशील राहणार.
-देवजीभाई चौधरी

Check Also

पनवेलमध्ये शेकाप कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल ः रामप्रहर वृत्त आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पनवेल तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाला गळती लागली …

Leave a Reply