पनवेल : हरेश साठे
राजकारणापेक्षा समाजकारण महत्त्वाचे असते आणि हि समाजहिताची शिकवण स्वर्गीय जनार्दन भगत साहेबांनी दिली, त्यामुळेच समाजकार्याला महत्व मिळाले, असे प्रतिपादन जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी बुधवारी (दि.7) उलवा नोड येथे केले.
कष्टकर्यांचे द्रष्ट नेते थोर समाजसुधारक स्व.जनार्दन आत्माराम भगत यांच्या 37 व्या पुण्यतिथी निमित्ताने जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण, क्रीडा व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या संस्था आणि व्यक्तींचा गुणगौरव तसेच पनवेल तालुकास्तरीय स्व. जनार्दन भगत स्वच्छ ग्रामपंचायत पुरस्कार स्पर्धा 2025 पारितोषिक वितरण समारंभ उलवे नोड मधील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे समारंभपूर्वक व मोठ्या उत्साहात पार पडला. त्यावेळी समारंभ अध्यक्ष म्हणून मार्गदर्शन करताना बोलत होते.
स्वर्गीय जनार्दन भगत साहेबांनी अहोरात्र आपला देह ’बहुजन हिताय बहुजन सुखाय’ या तत्त्वाच्या पूर्ततेसाठी कारणी लावला. तळागाळातल्या लोकांबदल त्यांना विशेष प्रेम होते. दारिद्रय व भूक यांच्याबद्दल अगदी मनापासून तळमळ होती. तळागाळातील समाजाचा उद्धार फक्त शिक्षणामूळेच होऊ शकते हे त्यांनी जाणले होते. आपली दूरदृष्टी, अविश्रांत श्रम, चिकाटी, धडाडी त्याचबरोबर व्यापक समाजहिताची तळमळ ही उदात्त भावना स्व. जनार्दन भगत साहेब यांच्या अंतःकरणात कायम होती. जनार्दन भगतसाहेबांचे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील कार्य अफाट राहिले असून त्यांनी अहोरात्र लोकांची सेवा केली. आयुष्यापेक्षा ध्येय्य मोठे असले पाहिजे, ही शिकवण त्यांनी समाजामध्ये रुजवत फक्त राजकारण नाही तर सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांनी विभागातील भांडणतंटे दूर करण्याच्या दृष्टिकोनातून देवदूताची भूमिका सुद्धा पार पाडत समाजाला न्याय दिला.भगतसाहेबांनी कुटुंबाला नाही पण समाजाच्या हितासाठी आपले आयुष्य खर्च केले. त्यांच्या मुशीतून राजकीय, सामाजिक चळवळीचे कार्यकर्ते घडविले. त्याचबरोबर बेळगाव सीमा प्रश्नावर त्यांनी एक वर्ष कारावास सोसला आहे. भगतसाहेबांचे कार्य अफाट राहिले आहे, त्यामुळे त्यांचा त्याग आणि त्यांची स्मृती कायम स्मरणात रहावे, यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भगतसाहेबांची जयंती आणि पुण्यतिथी सामाजिक उपक्रमात साजरी केली जाते. त्या अनुषंगाने यंदाही पुण्यतिथीचा कार्यक्रम समाजोपयोगी उपक्रमाने पार पडला.
या वेळी ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत पनवेल तालुकास्तरीय स्व. जनार्दन भगत स्वच्छ ग्रामपंचायत पुरस्कार स्पर्धा 2025 मधील विजेत्या ग्रामपंचायतींचा तसेच गुणिजनांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला तसेच या वेळी ’देवकी मीडिया’ प्रस्तुत व ’कलारंजना मुंबई’ निर्मित, उदय साटम संकल्पित आणि दिग्दर्शित मराठी पाऊल पडते पुढे हा 101 कलावंताचा संच असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा 4600 वा प्रयोग सादर झाला.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पुढे बोलताना सांगितले की, लोकनेते दि. बा. पाटील यांनी भगतसाहेबांना आणि त्यांनी आम्हा सर्वांना घडवले. भगतसाहेबांची शिकवणी मोठी होती आणि ती आम्ही अंगिकारली. ग्रामस्वच्छता, शिक्षण आणि न्यायावर त्यांनी भर दिला. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, आंबेडकर, फुले यांच्या विचाराचा पगडा त्यांच्यावर होता. त्याचबरोबर संघटन त्यांचा आत्मा होता. अनिष्ठ प्रथांना त्यांचा कायम विरोध राहिला आहे. त्याच धर्तीवर वायफळ खर्च करण्यापेक्षा सामाजिक कार्य, गरजवंतांना मदत करणे हा गुण चांगला आहे, त्या अनुषंगाने सर्वानी कार्यरत रहावे, असे आवाहनही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले. आपला देश आणि महाराष्ट्र पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुढे चालला असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या वेळी लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांनी, भगतसाहेबांचा शिक्षण आणि स्वच्छता जिव्हाळ्याचा विषय होता त्यामुळे त्यांनी प्रकर्षाने त्यामध्ये स्वतःला झोकून काम केले असल्याचे सांगितले. स्वच्छता विषयक जागृती वाढत चालली आहे. त्याला वेग आणण्यासाठी सिडको हद्दीतील गावांनी घनकचरा वर्गीकरण आणि निर्मूलन प्रकल्पासाठी आग्रह धरला पाहिजे, असे त्यांनी सांगत पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायत आणि गुणिजनांचंही कौतुक करून त्यांना पुढील यशस्वी वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.
या वेळी प्रमुख पाहुणे माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, भगतसाहेब थोर माणूस. ते आम्हा सर्वांचे गुरु होते. त्यांची दरवर्षी पुण्यतिथी साजरी होत असताना फेब्रुवारी लीपमुळे दरवर्षी चार वर्षांनी जयंती असते तीसुद्धा मोठ्या सामाजिक कार्यात उत्साहात साजरी केली जात आहे. भगतसाहेब कमी शिकले असले तरी त्यांना शिक्षणाची खूप आवड होती. त्यांच्या नावाने असलेल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेने मोठे यश मिळवले आहे. भगतसाहेब न्यायदानाचे काम करायचे आणि याच संस्थेतून दोन न्यायाधिश तयार झाले. संस्थेचे यशाचे सर्वश्रेय रामशेठ ठाकूर यांना जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
या वेळी प्रमुख पाहुणे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी म्हटले की, भगत साहेबांनी सामाजिक कामांचा पाया रचला तर लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कळस बांधला, जावई कसा असावा तर रामशेठ ठाकूर यांच्यासारखा, कारण त्यांनी शेलघर या त्यांची सासुरवाडी असलेल्या गावात होणार्या साई मंदिराला अडीच कोटी रुपयांची देणगी दिली. त्यांनी जगभर नाव निर्माण करणारी भगतसाहेबांच्या नावाने शिक्षण संस्था उभी केली. भगत साहेबांनी माणसे पेरली, गव्हाण परिसराच्या विकासात रामशेठ ठाकूर यांचा मोलाचा वाटा आहे. मै जहाँ खडा रहता हूँ, लाईन वहासे शुरू होती है, हे रामशेठ ठाकूर यांनी दाखवून दिले. त्यांनी जिथे हात लावला तिथे सोने झाले, जावई कसा असावा तर रामशेठ यांच्यारखा हे त्यांनी दाखवून दिले. ‘दिबां’ना सिडकोचे अधिकारी घाबरत असत, आता लोकनेते रामशेठ ठाकूर यांना घाबरतात, याचा अनुभव मला आहे. ‘दिबां’नंतर एकच नेता म्हणजेच लोकनेते रामशेठ ठाकूर आहेत. रामशेठ ठाकूर हे रयत शिक्षण संस्थेला देणगी देणारे मोठे देणगीदार आहेत, त्यांचे कार्य खूप मोठे असून लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी माणसे टिकवली त्यांना पुढे आणले त्याचबरोबरीने भगतसाहेबांचा वारसा समर्थपणे पुढे नेण्याचे काम केले, असेही महेंद्र घरत यांनी अधोरेखित केले तसेच भगतसाहेब मितभाषी आणि सर्वाचा विचार करणारे होते, तो गुण आमदार प्रशांत ठाकूर यांच्यामध्ये असल्याचेही त्यांनी सांगितले.
या समारंभाचे प्रास्ताविक जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी केले. त्यांनी भगतसाहेबांच्या कार्याला व आठवणींना उजाळा दिला.
रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे झालेल्या या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार महेश बालदी, भगतसाहेबांच्या कन्या व लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सुविद्य पत्नी शकुंतला ठाकूर, दिबासाहेबांचे सुपुत्र अतुल पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे व्हाइस चेअरमन वाय. टी. देशमुख, पांडुशेठ घरत, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे सचिव परेश ठाकूर, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या कार्यकारी मंडळ सदस्या वर्षा ठाकूर, अनिल भगत, संजय भगत, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील, माजी महापौर कविता चौतमोल, संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे, पनवेल पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी सीताराम मोहिते, कर्जत गटशिक्षण अधिकारी नवनाथ साबळे, माजी पंचायत समिती सदस्य भाऊशेठ पाटील, रत्नप्रभा घरत, वसंतशेठ पाटील, भाजपचे नेरे मंडल अध्यक्ष भूपेंद्र पाटील, नवीन पनवेल मंडल अध्यक्ष दशरथ म्हात्रे, उलवे मंडल अध्यक्ष रुपेश धुमाळ, शिवकर सरपंच आनंद ढवळे, माजी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, अमोघ ठाकूर, आदेश ठाकूर, माजी नगरसेवक अजय बहिरा, राजेश्री वावेकर, वृषाली वाघमारे, विजय घरत, जितेंद्र म्हात्रे, जयवंत देशमुख, चिंतामणी घरत, कमलाकर देशमुख, भार्गव ठाकूर, सुधीर ठाकूर, विश्वनाथ कोळी, अनंता ठाकूर, निलेश खारकर, वामन म्हात्रे, यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी आणि हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
समारंभाचे सूत्रसंचालन प्रसिध्द निवेदिका समीरा गुजर तसेच आकाश पाटील, सागर रंधवे यांनी तर आभार वाय. टी. देशमुख यांनी मानले.
Check Also
गिरवलेचे सरपंच प्रताप हातमोडे भाजपमध्ये दाखल
पनवेल : रामप्रहर वृत्तगिरवले गावचे सरपंच प्रताप चंद्रकांत हातमोडे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी भारतीय जनता पक्षामध्ये …
RamPrahar – The Panvel Daily Paper