पनवेल विधानसभा मतदारसंघात उर्वरित लाभार्थ्यांना घरघंटी व शिलाई मशीनचे वाटप सुरू
पनवेल : रामप्रहर वृत्त
सामान्य नागरिकांचे हित केंद्रस्थानी ठेवून कार्य करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांच्या सर्वांगीण विकास व सक्षमीकरणासाठी दूरदृष्टीपूर्ण, प्रभावी आणि समाजाभिमुख योजना अमलात आणल्या आहेत. या योजनांमुळे महिलांना आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करण्याची नवी दिशा मिळत असून त्यांचा सामाजिक व आर्थिक स्तर अधिक भक्कम होत आहे, असे प्रतिपादन कार्यसम्राट व लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांनी शनिवारी (दि. 13) येथे केले.
पनवेल विधानसभा मतदारसंघातील महिलांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकारातून राबविण्यात येत असलेल्या घरघंटी व शिलाई मशीन वाटप उपक्रमाचा पुढील टप्पा शनिवारपासून सुरू झाला. काही दिवसांपूर्वी या योजनेचा शुभारंभ करण्यात आला होता. शहरी भागातील प्रभाग 14 ते 20मधील लाभार्थी महिलांना या वेळी मशीनचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात ते प्रमुख मान्यवर म्हणून बोलत होते.
प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेंतर्गत जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमांतर्गत एकूण 4,250 पात्र महिलांची निवड करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात मोठ्या संख्येने महिलांना शिलाई मशीन व घरघंटीचे वाटप करण्यात आले होते. शनिवारपासून शहरी भागातील लाभार्थी महिलांना मशीन व प्रमाणपत्रांचे वाटप करून हा उपक्रम यशस्वीरीत्या पूर्णत्वास नेण्यात येत आहे. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून या वेळी उपस्थित सर्वांना बालविवाहाविरोधात शपथ देण्यात आली.
पनवेल मार्केट यार्ड येथे झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, माजी महापौर कविता चौतमोल, माजी उपमहापौर चारुशीला घरत, सीता पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, जिल्हा उपाध्यक्ष गणेश कडू, सरचिटणीस अॅड. प्रकाश बिनेदार, माजी पनवेल शहराध्यक्ष अनिल भगत, विद्यमान शहराध्यक्ष सुमित झुंझारराव, नवीन पनवेल अध्यक्ष दशरथ म्हात्रे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे, माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील, माजी नगरसेवक अजय बहिरा, तेजस कांडपिळे, एकनाथ गायकवाड, प्रभाकर बहिरा, रघुनाथ बहिरा, मुकीत काझी, माजी नगरसेविका दर्शना भोईर, सुशीला घरत, डॉ. सुरेखा मोहोकर, वृषाली वाघमारे, राजेश्री वावेकर, वर्षा नाईक, नीता माळी, रेणुका मोहोकर, कामगार आघाडीचे प्रदेश सचिव संजय भगत, रूपेश नागवेकर, उमेश इनामदार, केदार भगत, प्रीतम म्हात्रे, संयोजक संतोष पवार, अॅड. चेतन जाधव, युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष हिमेश बहिरा, सपना पाटील, भीमराव पोवार यांच्यासह हजारोच्या संख्येने लाभार्थी उपस्थित होत्या.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भाषणात पुढे बोलताना सांगितले की, सर्वसामान्यांच्या हिताचा केंद्रबिंदू ठेवून कार्य करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी दूरदृष्टीपूर्ण व परिणामकारक योजना राबविल्या आहेत. महिलांना केवळ लाभार्थी न ठेवता त्यांना सक्षम उद्योजक, आत्मनिर्भर व्यक्ती आणि कुटुंबाच्या आर्थिक प्रगतीचा कणा बनविण्याचा या योजनांचा उद्देश आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक भगिनीने शासनाच्या विविध योजनांचा योग्य लाभ घेत स्वतःमधील कौशल्यांचा विकास करावा, नवे तंत्र आत्मसात करून स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण कराव्यात आणि कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पुढाकार घ्यावा. महिलांनी आत्मविश्वासाने पुढे येत आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारल्यास केवळ कुटुंबच नव्हे, तर समाज आणि राष्ट्राचीही प्रगती अधिक वेगाने साध्य होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार मानतो की, त्यांनी ही खनिकर्म योजना आणली आणि त्या माध्यमातून आम्हाला या सर्व बहिणींना योजनेचा लाभ देता आला.
2014 सालच्या आधीही योजना होत्या, मात्र त्या प्रत्यक्ष लाभार्थीपर्यंत पोहचत नव्हत्या. मोदीजी पंतप्रधान झाल्यानंतर सर्व स्तरांसाठी योजना अमलात आल्या आणि त्या प्रभावी व यशस्वीपणे राबविल्या जात आहेत. कोविडचे संकट आले होते, त्या वेळी मोदींजींनी देशातील प्रत्येक माणसाचा विचार केला, तर राज्यात तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने कोणताच दिलासा नाही. उलट कल्याणकारी प्रकल्पांना स्थगिती दिली. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार आल्यानंतर योजनांना बळ मिळाले. त्याचबरोबरीने लाडकी बहीण योजना आणून बहिणींना लखपती बनविण्याचे प्रयत्न सुरू केले. आता या योजनेवर विरोधक टपून बसले आहेत आणि ही योजना बंद करण्यासाठी वाट पहात आहेत, असा टोला आमदार प्रशांत ठाकूर यांनी विरोधकांना लगावला.
‘दिबां’चेच नाव विमानतळाला असणार!
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणासंदर्भात बोलताना आमदार प्रशांत ठाकूर या वेळी म्हणाले की, भाजपचे सरकार आले आणि लोकनेते दि.बा. पाटील यांच्या नावाचा ठराव झाला, मात्र ‘दिबां’च्या नावाला तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने विरोध केला होता. ‘दिबां’च्या नावासाठी आम्ही लढा उभारला. आमच्यावर विमानतळ नामकरणाच्या पाच पाच फौजदारी गुन्हे आहेत. त्यामुळे विरोधकांनी गमजा मारू नयेत. पुणे येथील विमानतळाला जगद्गुरू संत तुकाराम, संभाजीनगर विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात येणार आहे. तेथेही तांत्रिक प्रकियेमुळे उशीर होत असून ‘दिबां’चेच नाव विमानतळाला असणार आहे, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भाषणातून अधोरेखित केले.
लाडक्या प्रशांतदादांच्या पुढाकाराने सर्व समाजासाठी सातत्यपूर्ण लोककल्याणकारी कार्य -जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी
भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी आपल्या भाषणात सांगितले की, पनवेल विधानसभा मतदारसंघात सर्व समाजघटकांच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार प्रशांत ठाकूर हे सातत्याने व तळमळीने कार्यरत असून सामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध लोककल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवत आहेत. महिलांचे सक्षमीकरण, युवकांना रोजगाराच्या संधी, सामाजिक घटकांना आधार देणार्या योजना अशा अनेक उपक्रमांमुळे आमदार प्रशांत ठाकूर यांची नाळ सर्वसामान्य जनतेशी घट्ट जोडली गेली आहे.
सर्व समाजासाठी समानतेने काम करणारे नेतृत्व म्हणून ‘दादा’ अशी ओळख निर्माण केलेले आमदार प्रशांत ठाकूर हे मोठ्या मनाचे व संवेदनशील नेतृत्व मानले जाते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणार्या योजनांमुळे अनेक कुटुंबांना दिलासा मिळाला असून स्वयंरोजगार, शिक्षण, आरोग्य व सामाजिक विकासाच्या दिशेने मतदारसंघात सकारात्मक बदल घडला आहे. यापुढील काळातही या तसेच इतर नव्या लोकहितकारी योजना आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून सुरू राहतील, असा विश्वास अविनाश कोळी यांनी व्यक्त करत सर्वसामान्यांच्या समस्या समजून घेऊन त्यावर तातडीने उपाययोजना करणार्या या नेतृत्वाबद्दल देण्यात येणारे आभार अपुरेच आहेत असे नमूद केले. सामाजिक बांधिलकी जपत, सर्व समाजघटकांना सोबत घेऊन विकासाचा मार्ग अवलंबणारे आमदार प्रशांत ठाकूर यांचे कार्य पनवेल विधानसभा मतदारसंघासाठी दिशादर्शक ठरत आहे. त्यामुळे ते सर्वांचे लाडके प्रशांतदादा असून भगिनी लाडक्या प्रशांतदादांना धन्यवाद देत आहेत, असेही ते म्हणाले.
या वेळी माजी महापौर कविता चौतमोल यांचेही भाषण झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नवीन पनवेल मंडळ अध्यक्ष दशरथ म्हात्रे यांनी केले, तर आभार पनवेल शहर मंडळ अध्यक्ष सुमित झुंझारराव यांनी मानले.
महिलांच्या स्वयंरोजगार उपक्रमाला सातत्य
ग्रामीण भाग आणि त्यानंतर आज शहरी भागातील लाभार्थींना वाटप सुरू झाले. त्यापुढील टप्प्यात कळंबोली, कामोठे व खारघर येथील लाभार्थीना यंत्रसामुग्रीचे वाटप होणार आहे. या उपक्रमामुळे पनवेल मतदारसंघातील अनेक महिलांना घरगुती उद्योग सुरू करण्याची संधी मिळाली असून शिलाई, पीठ गिरणी तसेच इतर पूरक व्यवसायांद्वारे महिलांना स्थिर उत्पन्नाचा मार्ग उपलब्ध झाला आहे. स्वयंरोजगाराच्या माध्यमातून महिलांनी कुटुंबाच्या आर्थिक उन्नतीस हातभार लावावा हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी यापूर्वी स्पष्ट केले होते. महिलांनी मिळालेल्या यंत्रसामग्रीचा योग्य व सातत्यपूर्ण वापर करून आपला व्यवसाय वृद्धिंगत करावा, असे आवाहन या वेळी करण्यात आले.
शासन स्तरावर यंत्रसामग्रीच्या वापराचे सर्वेक्षण करण्यात येणार असून स्वयंरोजगारात विशेष प्रगती करणार्या महिलांना प्रोत्साहन देण्यात येणार असल्याची माहितीही या वेळी देण्यात आली. या योजनेमुळे पनवेल विधानसभा मतदारसंघातील महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले असून भविष्यात उपलब्ध निधीनुसार या उपक्रमाचा पुढील टप्पाही राबविण्यात येणार आहे. उर्वरित लाभार्थ्यांना आज वाटप पूर्ण झाल्याने महिलांकडून समाधान व्यक्त करण्यात येत असून आमदार प्रशांत ठाकूर यांच्या या उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात येत आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper