उरण : वार्ताहर
1984 साली उरण तालुक्यात झालेल्या गौरवशाली व शेतकरी लढ्यातील हुतात्म्यांना आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी शनिवारी (दि. 17) पागोटे येथील कार्यक्रमात अभिवादन केेले.
शेतकर्यांच्या न्याय्य हक्कांसाठी लोकनेते दि.बा. पाटील यांच्या नेतृत्वाखाली सन 1984मध्ये लढा उभारण्यात आला होता. त्या वेळी दास्तान व नवघर येथे जमलेल्या शेतकरी आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी बेछूट गोळीबार केला. यात नामदेव शंकर घरत (चिर्ले), रघुनाथ अर्जुन ठाकूर (धुतुम), कमलाकर कृष्णा तांडेल, महादेव हिरा पाटील आणि केशव महादेव पाटील (पागोटे) हुतात्मे झाले. या पाचही हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी आणि त्यांचे स्मरण करण्यासाठी दरवर्षी 16 जानेवारी रोजी जासईत, तर 17 जानेवारी रोजी पागोटे येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.
हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी शनिवारी पागोटे येथे स्मृतिदिन कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला भाजपचे ज्येष्ठ नेते जे.एम. म्हात्रे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, ‘दिबां’चे पुत्र अतुल पाटील, भाजप जिल्हा सरचिटणीस व नगरसेवक नितीन पाटील, माजी जि.प. सदस्य विजय भोईर, माजी सरपंच योगेश पाटील, जितेंद्र म्हात्रे, गाव अध्यक्ष रजनीकांत पाटील, भार्गव पाटील, कॉ. भूषण पाटील आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी हुतात्म्यांना मानवंदना देण्यात आली तसेच हुतात्मा अमर रहे अशा घोषणा देण्यात आल्या.
Check Also
नवी मुंबई विमानतळाला ‘दिबां’चे नाव द्या; भाजपचे लक्षवेधी आंदोलन
पनवेल : रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्व. दि.बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी …
RamPrahar – The Panvel Daily Paper