Breaking News

रिलायन्सच्या व्यवस्थापकाचे अपहरण व सुटका

पोलिसांकडून त्रिकुटाचा शोध सुरू

पनवेल : बातमीदार

शेतातून जाणार्‍या गॅस पाइपलाइनचा मोबदला मिळविण्यासाठी तिघा व्यक्तींनी रिलायन्स गॅस पाइपलाइन कंपनीचे व्यवस्थापक हितेन राय याला गाडीमधून डांबून नेल्याचा प्रकार सोमवारी सकाळी खारघरमध्ये घडला, मात्र या तिघांनी हितेन रायसोबत नुकसान भरपाईबाबत बोलणी केल्यानंतर त्याला ऐरोलीत सोडून पलायन केले. या घटनेनंतर खारघर पोलिसांनी तिघांवर अपहरणाचा गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.

याप्रकरणी तुषार सावंत, मोहन सावंत आणि पी. टी. सावंत या तिघांवर गुन्हा दाखल असून हे तिघेही पालघर जिह्यातील वाडा येथील अंबीत बुद्रुक गावातील आहेत. रिलायन्स कंपनीच्या वतीने टाकण्यात येणारी गुजरातमधील जामनगर ते नागोठणे ही गॅस पाइपलाइन वाडा येथील काही शेतकर्‍यांच्या शेतातून जात आहे. त्यामुळे वाडा भागातील जमीनमालकांना गॅस पाइपलाइन कंपनीकडून काही मोबदलाही देण्यात आला आहे. त्यातीलच तुषार सावंत, मोहन सावंत आणि पी. टी. सावंत हे तिघेही गॅस पाइपलाइनमुळे बाधित होणार्‍या जमिनीची नुकसान भरपाई मिळविण्यासाठी प्रयत्नशील होते, मात्र व्यवस्थापक हितेन राय हा त्यांना भेट देत नसल्याने सोमवारी सकाळी हे तिघेही तो राहत असलेल्या खारघरमधील इमारतीजवळ आले होते. या वेळी त्यांनी मोबदल्याची बोलणी करायचे आहे, असे बोलून त्याला जबरदस्तीने गाडीमधून नेले. त्यामुळे हितेनच्या पत्नीने याबाबतची माहिती कंपनीतील वरिष्ठ अधिकार्‍यांना दिली. त्यानंतर राय यांच्या पत्नीने खारघर पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी तिघांवर अपहरणाचा गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला असतानाच, त्या तिघांनी हितेन रायसोबत नुकसान भरपाईच्या मोबदल्यासंदर्भात बोलणी करून रायला ऐरोलीत सोडून देत पलायन केल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply