पनवेल : नितीन देशमुख
पनवेल शहरातील इंदिरानगर, लक्ष्मी वसाहत, शिवाजीनगर या झोपडपट्टीत बेकायदेशीरपणे व्यवसाय करणार्या गाळ्यांवर आणि हॉटेल सुभाष पंजाबवर बुधवारी सकाळी पनवेल महानगरपालिकेने कारवाई करून त्यांचे बांधकाम पाडल्यावर त्याठिकाणी पुन्हा बांधकाम होऊ नये यासाठी रस्त्याच्या कामाला लगेच सुरुवात करण्यात येणार आहे. त्याठिकाणी राहणार्या ज्या कुटुंबांच्या झोपड्या पाडल्या त्यांची राहण्याची सोय महापालिकेतर्फे निवारा केंद्रात करण्यात आली आहे.
पनवेल शहरातून जाणार्या महामार्गाच्या उड्डाणपुलाच्या कामात झोपडपट्टीचा अडथळा येत असल्याने इंदिरानगर, लक्ष्मी वसाहत, शिवाजी नगर या झोपडपट्टीतील अनधिकृत गाळे बुधवार 29 मे रोजी पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आले असून तेथील तोडलेल्या बांधकामाचा मलमा हलवण्यास सुरुवात झाली आहे. लगेच त्याठिकाणी पुन्हा कोणी बांधकाम करू नये म्हणून पत्रे उभे करून रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. यावेळी तेथील पाडलेल्या झोपडीत जी कुटुंबे राहत होती त्यांना पावसाळा जवळ आला असल्याने तात्पुरते राहण्यासाठी महापालिकेने दिन दयाळ अंत्योदय योजना अंतर्गत निवारा केंद्रात प्रत्येक खोलीत दोन कुटुंबांची सोय केली आहे.या निवारा केंद्रात जाईबाई पवार, अनिल शिंदे, मंदा पारदेकर, प्रिया पवार, काशीबाई पवार आणि इतर कुटुंबांची सोय करण्यात आली आहे. येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चाळीत एका खोलीत दोन -तीन कुटुंबांची सोय केली आहे. प्रत्येकाचे कुटुंबात पाच-सहा माणसे असल्याने जागा कमी पडत असल्याचे आणि पाण्याची व्यवस्था कमी असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper