मुंबई ः प्रतिनिधी
देशाच्या पश्चिम-किनारपट्टीजवळ असलेल्या अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण होईल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. 11 आणि 12 जूनदरम्यान हे चक्रीवादळ धडकणार असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. राज्याच्या किनारपट्टीपासून सुमारे 300 किलोमीटर दूर हे वादळ राहणार आहे. त्यामुळे राज्याला धोका नाही, असा निर्वाळाही हवामान विभागाने दिला आहे.
हे चक्रीवादळ राज्यात धडकण्याची शक्यता नाही, परंतु त्याच्या प्रभावामुळे या काळात किनारपट्टीवर वार्याचा वेग वाढलेला दिसेल. चक्रीवादळाच्या जवळ असलेला समुद्र अधिक खवळलेला, तर किनारपट्टीजवळील समुद्र काही प्रमाणात खवळलेला दिसेल. यादरम्यान कोकणासह मुंबईत पावसाच्या हलक्या सरी कोसळतील, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. सुरक्षिततेसाठी मच्छीमारांनी 11 आणि 12 जून रोजी अरबी समुद्रात जाणे टाळावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
हवामान विभागाने मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याची घोषणा केली आहे. हळूहळू हा मान्सून पुढे सरकेल, अशी माहितीदेखील या वेळी हवामान विभागाने दिली. 10 जूनऐवजी दोन दिवस अगोदरच मान्सूनचे केरळमध्ये आगमन झाले आहे. राज्यातील सध्याच्या भीषण दुष्काळात पाणीटंचाईचाही सामना करावा लागत आहे, मात्र मान्सूनच्या आगमनामुळे राज्याला दिलासा मिळणार आहे. येत्या आठवड्यात मान्सून राज्यात दाखल होईल, असा अंदाज आहे. पुढील साधारणतः चार दिवसांत मान्सून दाखल होईल. सकाळी वर्धा, मनमाड, कोल्हापुरात वादळी वार्यासह झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने थैमान घातले होते. या वेळी काही घरांवरील छपरेदेखील उडाली.