Breaking News

अर्धे उरण अंधारात ; वीज मंडळाचा सावळा गोंधळ ‘उजेडात’

उरण ः रामप्रहर वृत्त

गेल्या दोन-तीन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे उरण वीज मंडळाचा सावळा गोंधळ उघड झाला असून काल (दि. 30) मध्यरात्रीपासून वीज गायब झाली आहे. सकाळपासून अनेक वेळा तक्रार करूनही दुपारपर्यंत वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला नाही. काही दिवसांपूर्वी या संदर्भात बैठक होऊनही वीज मंडळाचा कारभार सुधारताना दिसत नसल्याने जनतेत नाराजीचा सूर निघत आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून वीज मंडळाचा भोंगळ कारभार उघड होत आहे. या विरोधात आमसभेत अनेक वेळा जनतेने आगपाखड करूनही कारभार सुधारण्याऐवजी अधिकच बिघडत चालला असल्याचे दिसते. काही दिवसांपूर्वी संतप्त बोरी व इतर गावातील ग्रामस्थांच्या उपस्थितीत पनवेल-उरणमधील वीज अधिकार्‍यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्या वेळी समस्या लवकरच मार्गी लावू, असे नेहमीच्या स्टाईलने उत्तर दिले. आता त्याला काही दिवसांचा अवधी उलटूनही विजेचा लपंडाव सुरूच असल्याचे दिसते.

काल मध्यरात्रीपासून पाऊसवार्‍याने धुमाकूळ घातल्याने अनेक ठिकाणी झाडे वीज तारांवर कोसळल्याने वायर तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे वीज सुरळीत होण्यास विलंब होत आहे, हे जरी खरे असले, तरी काम करताना जी तत्परता हवी ती वीज कर्मचारी वर्गात दिसत नाही. त्यांना वरिष्ठ अधिकार्‍यांनी तक्रारीची माहिती देऊनही ते वेळ मारून नेत आहेत, अशा कामचुकार कर्मचार्‍यांवर वरिष्ठ अधिकार्‍यांचा वचक नसल्याचे

उघड होते. वीजपुरवठा खंडित झाल्यावर कधी येईल, हे सांगता येत नाही, मात्र बिल आहे तेवढेच येते, तसेच वीज ग्राहकांनी एक महिन्याचे बिल भरले नाही तर लाईन कट केली जाते. उरणमधील हॉटेल, बारमध्ये रात्रीच्या वेळेत वीज कर्मचारी वीज कनेक्शन डायरेक्ट करतात परत सकाळी पूर्ववत करतात. यामुळेही रात्री विजेवर लोड येऊन विजेचा लपंडाव सुरू होतो. याची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई केली, तरच काही तरी सुधारणा होईल अशी चर्चा आहे.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply