Breaking News

जालन्यातील धामणा धरणाला तडे, चार गावांना धोका

जालना : प्रतिनिधी

एकीकडे चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटलं असतानाच तिकडे जालना जिल्ह्यातल्या धामणा धरणाच्या भिंतीलाही तडे गेले आहेत. भिंतीमधून पाणी पाझरत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या तड्यांमुळे धरणाच्या आजूबाजूच्या तीन ते चार गावांना मोठा धोका निर्माण झाला आहे. धामणा धरण हे भोकरदन तालुक्यातील सेलूदमध्ये आहे. या धरणात सध्या 90 टक्के पाणीसाठा आहे. गेल्या पाच वर्षात प्रथमच धरणात एवढा पाणीसाठा जमा झाला आहे, मात्र धरणाच्या भिंतील तडे गेले असून पाणी पाझरत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सेलूद, पारध, खुर्द पारध, बुद्रुक या चार गावांना धोका होऊ शकतो. मागील दोन दिवसांपासून जालना जिल्ह्यात विविध ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. सोमवारी चांगला पाऊस झाला. त्यामुळे नदी-नाले तुडुंब वाहू लागले असून, रायघोळ नदीला पूर आला होता, तर जुई, धामणा धरणात पाण्याची आवक होऊ लागली आहे, मात्र पाणी वाढल्याचा आनंद असताना, दुसरीकडे धरणाच्या भिंतीला तडा गेल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, जालन्याचे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी तत्काळ धरणावर जाऊन होत असलेल्या गळतीची पाहणी केली. यावेळी गावकर्‍यांनी धरणापासून निर्माण होणार्‍या समस्यांचा पाढा जिल्हाधिकार्‍यांसमोर वाचला. धरणक्षेत्रात खोदल्या जाणार्‍या विहिरीत ब्लास्टिंग घेतल्याने या धरणाच्या भिंतीला तडे गेल्याचे गावकर्‍यांनी सांगितले. जिल्हाधिकार्‍यांनी गळतीची पाहणी केल्यानंतर ग्रामस्थांनी तत्काळ धरणातील पाणी गळतीबाबत उपाययोजना करण्याची मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply