हैदराबाद : वृत्तसंस्था
तेलंगण, आंध्र प्रदेश आणि केरळला भाजपचा बालेकिल्ला बनवा. या राज्यांतील 50 टक्क्यांहून अधिक मते भाजपच्या पारड्यात पडायला हवीत, असा कानमंत्र भाजप पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी हैदराबाद येथे कार्यकर्त्यांना दिला आहे. दक्षिण भारतातील भाजप सदस्य जोडणी अभियानाचा शुभारंभ त्यांनी केला. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथे भाजपच्या सदस्य जोडणी अभियानाची सुरुवात केली होती. देशातील प्रत्येक गावात भाजपचा एक तरी सदस्य असायला हवा, अशी आशा त्यांनी त्यावेळी व्यक्त केली होती. 2019 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये देशातील 17 राज्यांमध्ये भाजपला 50 टक्क्यांहून अधिक मते मिळाली आहेत. या सर्वच राज्यांमध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी करण्यात आली होती. पण दक्षिण भारतात मात्र कर्नाटक वगळता भाजपला कोणत्याच राज्यात विशेष यश मिळवता आले नाही. तेलंगणमध्ये केवळ 19 टक्के मते भाजपला मिळाली आहेत.