नवी मुंबई : प्रतिनिधी
रविवारी पहाटेपासून सुरू झालेल्या पावसामुळे नवी मुंबई शहरात विविध ठिकाणी पाणी भरल्याने वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यातच ठाणे बेलापूर महामार्गावर पाणी भरल्याने ठाणे-कळवायापासून महापेपर्यंत वाहतुकीचा खोळंबा झाला होता. मनपा क्षेत्रांतील झोपडपट्टी व गावठाण भागात पाणी घराघरात साचल्याने त्यांना मोठा त्रास झाला. विशेष म्हणजे तुर्भे औद्योगिक क्षेत्रात असणार्या गावात नाला तुंबल्याने अनेक घरात चार ते पाच फूट पाणी साचले होते. त्यांचे चांगलेच नुकसान झाले आहे. त्यामुळे पाणी तुंबण्यामागे अभियांत्रिकी विभागाचे की घनकचरा व्यवस्थापण विभागाचे अपयश याचा शोध घेण्याची गरज भासू लागली आहे.
नवी मुंबई शहर म्हणजे योजनाबद्ध शहर असे समजले जाते. परंतु सोमवारी (दि. 8)झालेल्या पावसात मात्र शहरातील बहुतांशी रस्ते पाण्यानी भरून गेले होते. वाशी येथील सेक्टर एक व सेक्टर दहा समोर असणार्या वाशी कोपरखैरणे रस्त्यावर तीन ते चार फूट पाणी साचल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला होता. तसेच ठाणे बेलापूर महामार्गावरही महापे येथे चांगलेच पाणी रस्त्यावर आल्याने सकाळपासून वाहतुकीचा बोजवारा उडाला होता.त्यामुळे नागरिकांचे चांगलेच हाल झाले.तसेच सानपाडा रेल्वे स्थानक ते तुर्भे परिसरात जाणार्या मुख्य रस्त्यावरही पाणी साचल्याने तुर्भे येथील मुंबई कृषी उत्पन्न मार्केटमध्ये जाणारे नागरिक व इतर कामासाठी जाणार्या नागरिकांना चांगलाच त्रास झाला होता.त्याचबरोबर ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, शिरावणे, सानपाडा आदी ठिकानातील अंडर पास रस्तेदेखील पाण्यानी भरल्याने ते अक्षरशः बंद करावे लागल्याचे चित्र नवी मुंबई परिसरात
दिसून आले.
झोपडपट्टी व गावठाण भागातही पावसाच्या जोरामुळे ठिकठिकनी पाणी साचले होते. तर दिघा, ऐरोली, रबाले, महापे, तुर्भे येथील झोपडपट्टीत पाणी घुसल्याने नागरिकांची त्रेधातरिपीट उडाली. तर गावठाण विभागातील अनेक चाळीतही पाणी घुसले होते. याचा फटका पुन्हा एकदा साई सदानंद नगर व गणेश नगर परिसराला बसला.तेथील अनेक घरात पाणी घुसल्याने सकाळपासून पाणी उपसण्यास तेथील नागरिकांनी सुरुवात केली होती. काही नागरिक आपल्या नियोजित कामावरही गेले नाहीत.