Breaking News

मुंबई काँग्रेसमधील वाद पेटला

मुंबई : प्रतिनिधी

मिलिंद देवरा यांनी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर मुंबई काँग्रेसमधील वादाला पुन्हा तोंड फुटले आहे. देवरांवर टीका करणारे पक्षाचे माजी मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांना वरिष्ठ नेते भाई जगताप यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेसी असल्याचा दावा करणारे नेतेच जातीयवाद आणि भाषावादाचे राजकारण करतात, अशा शब्दांत त्यांनी निरुपम यांच्यावर निशाणा साधला.

काँग्रेसमध्ये राजीनामासत्र सुरू असून, मिलिंद देवरा यांनी रविवारी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी देवरांना ट्विटद्वारे लक्ष्य केले. ‘राजीनाम्यातून त्यागाची भावना अंतःप्रेरणेतून येते. इथे दुसर्‍या क्षणी राष्ट्रीय पदाची मागणी केली जाते. हा राजीनामा आहे की वरच्या पदावर जाण्याची शिडी? अशा कर्मठ लोकांपासून पक्षाने सावध राहायला हवे,’ अशी टीका निरुपम यांनी देवरांवर केली होती.

या टीकेला काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. काही नेते काँग्रेसी असल्याचा दावा करतात, पण तेच जातीयवाद आणि भाषावादाचे राजकारण करतात. ते अन्य नेत्यांचा अपमान करतात आणि त्यांच्याच मतदारसंघातून निवडणूक लढवतात. इतके सगळे करूनही तब्बल अडीच लाखांहून अधिक मतांनी पराभूत होतात. अशा कर्मठ नेत्यांपासून सावध राहायला हवे, असे ट्विट करीत जगताप यांनी निरुपम यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply