
मुंबई : रामप्रहर वृत्त
आगरी दर्पणच्या डॉ. म. सु. पाटील विशेषांकाचे प्रकाशन शुक्रवारी (दि. 19) त्यांच्या जनमदिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक नीला उपाध्ये यांच्या हस्ते म. सुंच्या निवासस्थानी मुलुंड येथे कौटुंबीक वातावरणात झाले. प्रारंभी कवी अरुण म्हात्रे यांनी डॉ. म. सु. पाटील यांच्या साहित्याविषयी सविस्तर माहिती देऊन त्यांच्या व्यक्तीमत्वाचे अनेक पैलू उलगडले. ते समीक्षक म्हणून मराठी साहित्यात अढळ स्थानी होते पण माणूसपण जपणारे माणूस म्हणूनही श्रेष्ठ होते, असेही ते म्हणाले. त्यानंतर ज्येष्ठ पत्रकार नीला उपाध्ये यांनी म. सुं. च्या अनेक आठवणींना उजाळा देत त्यांचे साहित्यातील मोठेपण किती होते ते सांगितले. आगरी दर्पणचे संपादक व ज्येष्ठ पत्रकार दीपक म्हात्रे यांनी या अंकामागील भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, म. सुं.विषयी आमच्या मनात नेहमीच आदराची व आत्मियतेची भावना होती. त्यांच्या ’लांबा उगवे आगरी’ या आत्मचरित्राने तर त्या काळातली सामाजिक, आर्थिक व राजकीय परिस्थिती उलगडून दाखविली आहे. साहित्य क्षेत्रातील या ज्येष्ठ व क्षेष्ठ अशा व्यक्तीची समाजाला नव्याने ओळख व्हावी, यासाठी आम्ही हा विशेषांक काढल्याचे त्यांनी सांगितले व या अंकासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्यांचे आभार मानले. या वेळी कवी अरुण म्हात्रे आणि म. सुं. चे जावई प्रा. जयप्रकाश लब्दे यांनी म. सुं.ना आवडणार्या कविता सादर करून त्यांच्या स्मृती जागवल्या. शेवटी कवयित्री नीरजा आणि जयप्रकाश लब्दे यांनी पाटील कुटुंबीयांच्यातर्फे उपस्थितांचे तसेच आगरी दर्पण परिवाराचे विशेषत: संपादक दीपक म्हात्रे यांचे आभार मानले व हा विशेषांक बाबांच्या सर्व विद्यार्थ्यांना व हितचिंतकांपर्यत पोहोचवू, असे सांगितले. या कार्यक्रमाला आगरी दर्पणचे कार्यकारी संपादक जे.डी. तांडेल, सह व्यवस्थापक श्याम मोकल,विजया पडितराव, जगन्नाथ मोकल, राजन धुळेकर, अनिकेत जोशी, सीमंतीनी श्रीकृष्ण पाटील, अचला सुभाष पाटील, प्रा. जयवंत पाटील, अनुराधा पाटील व पाटील कुटुंबीय उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper