खोपोली : प्रतिनिधी
आदिवासी बांधव पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात भाज्यांची लागवड करतात. यावर्षी पावसाचे आगमन लांबल्यामुळे माळरानावर लावलेली भाजी तयार होण्यास विलंब लागला. मात्र मागील आठवड्यापासून विविध प्रकारच्या रानभाज्या बाजारपेठेत येऊ लागल्या आहेत.
पावसाच्या पाण्यावर तयार होत असलेल्या या भाज्या खाण्यासाठी रुचकर आणि चवदार असल्याने त्या भाज्या ग्राहक आवडीने खरेदी करतात. या भाज्यांची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याने अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. पावसाळ्यात तयार झालेली ताजी भाजी ग्राहक खरेदी करीत असल्याचे दृश्य बाजारपेठेत दिसत आहेत. यामध्ये प्रामुख्याने काकडी, माठ, पालक, मिरची, आळूची पाने, भेंडी या तसेच रानातील भाज्यांचा समावेश असून प्रत्येकजण या भाज्या खरेदी करीत आहे. पावसाच्या पाण्यावरील भाजी आरोग्यासाठीही चांगली असते.