Breaking News

पराभवानंतरही भारताच्या विक्रमांची सप्तपदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-20 सामन्यात तीन विकेट्सने पराभव पत्करावा लागला. भारतीय संघ या सामन्यात पराभूत झाला असला तरी या लढतीत त्यांनी तब्बल सात विक्रम रचले.

1. भारताच्या वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने या सामन्यात तीन विकेट्स पटकावले. या तीन बळींसह त्याने ट्वेन्टी-20 कारकिर्दीमध्ये 51 विकेट्स पूर्ण केले. बुमराने 51 बळी मिळवताना आर. अश्विनला (50) पिछाडीवर सोडले आहे.

2. ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये एका संघाविरुद्ध पाचशे धावा पूर्ण करण्याचा विक्रम या वेळी भारताचा कर्णधार विराट कोहलीने केला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध 14 सामन्यांमध्ये कोहलीने 56.88च्या सरासरीने 512 धावा केल्या आहेत, यामध्ये पाच अर्धशतकांचा समावेश आहे.

3. महेंद्रसिंह धोनीने या सामन्यात 37 चेंडूंमध्ये प्रत्यकी एक चौकार आणि षटकारासह 29 धावा केल्या. ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये जास्त चेंडू खेळून कमी धावा करण्याचा विक्रम आता धोनीच्या नावावर आहे. यापूर्वी हा विक्रम रवींद्र जडेजाच्या नावावर होता. जडेजाने 35 चेंडूंत एका चौकारासह 25 धावा केल्या होत्या.

4. या सामन्यात अर्धशतकी भागीदारी झाल्यानंतरही भारताची सर्वात कमी धावसंख्या झाली. लोकेश राहुल आणि विराट कोहली यांनी 55 धावांची भागीदारी रचली, पण भारताला या सामन्यात 126 धावाच करता आल्या.

5. या सामन्यात भारतासह ऑस्ट्रेलियाचाही असाच सारखा विक्रम झाला आहे. ऑस्ट्रेलियाची या सामन्यात 84 धावांची सर्वोच्च भागीदारी होती, पण त्यानंतरही ऑस्ट्रेलियाने 127 धावा करीत सामना जिंकला.

6. ऑस्ट्रेलियाने अखेरच्या चेंडूवर जिंकलेला हा फक्त दुसरा सामना ठरला आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाने 2016 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जोहान्सबर्ग येथे झालेला सामना अखेरच्या चेंडूवर जिंकला होता.

7. डी’आर्सी शॉर्टने या सामन्यात 37 चेंडूंत 100च्या स्ट्राइक रेटने 37 धावा केल्या. 30पेक्षा जास्त धावा कमी स्ट्राइक रेटने करणारा तो दुसरा ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी ब्रॅड हॅडिनने 46 चेंडूंत 91.3च्या स्ट्राईक रेटने 42 धावा केल्या होत्या.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply