Breaking News

कर्नाटकमधून भाजीपाल्याची आवक वाढल्याने भाव उतरले

नवी मुंबई : प्रतिनिधी

महापुरामुळे बाहेर गावावरून होणारी भाजीपाल्याची आवक थंडावल्यामुळे नवी मुंबई मधील मुंबई कृषी उत्पन्न बाजरापेठेत गेल्या दोन दिवसापासून भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडले होते.परंतु गेल्या दोन दिवसात पावसाचा जोर कमी झाल्याने बाहेर गावावरून भाजीपाला आल्याने गुरुवारी मुंबई कृषी उत्पन्न बाजार पेठेत भाज्यांचे भाव 20 ते 30 टक्क्यांनी कमी झाल्याचे सूत्रांनी सांगितले.परंतु टोमॅटोची आवक कमी व बाजारपेठेत असलेला टोमॅटो खराब झाल्याने टोमॅटोचे भाव मात्र चांगलेच वधारले  आहेत .

कोल्हापूर,सातारा,सांगली,पुणे व कर्नाटक परिसरात पावसाने थैमान घातल्याने अपेक्षित अश्या भाज्यांच्या ट्रक मुंबई कृषी उत्पन्न बाजार पेठ नवी मुंबईत आल्या नाहीत.दररोज 700 ते 750 ट्रकद्वारे येणारा विविध भाजीपाला पावसाचा जोर वाढल्याने फक्त 250 ट्रकद्वारे येऊ लागल्याने मागणी जास्त व पुरवठा कमी यांमुळे मागील गेले दोन दिवस भाज्याचे भाव कडाडले होते.परंतु सध्या पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याने गुरुवारी निम्म्या म्हणजे 300 ते 350 ट्रकद्वारे भाजीपाला बाजार पेठेत पोहचला.त्यामुळे भाजीपाल्याच्या भावात वीस ते तीस टक्के घसरण झाली.

कर्नाटक,बेळगाव येथून वीस ते पंचवीस ट्रकने भाजीपाला आला.कोल्हापूर येथे सर्वच रस्ते पाण्याखाली गेल्याने बेळगाव येथील ट्रक सोलापूर पंढरपूर मार्गे दुप्पट भाडे देऊन मुंबई कृषी उत्पन्न बाजारपेठेत पोहचल्या.गुरुवारी कर्नाटक मधून आलेल्या वाहनात कोबी फरशी, ओला वटाणा आल्याने कडाडलेल्या भावात घसरण झाली असल्याचे व्यापारी नितीन वाळुंज यांनी सांगितले.

सध्या कोबी दर दहा किलोला 200 ते 240,फ्लॉवर 160 ते 200,फरशी 600 ते 800,ओला वाटाणा 700 ते 900,मिरची 240 ते 300, तर टोमॅटोच्या बाजारभाव मात्र 800 ते 1000 रुपये भाव दर दहा किलोला होता. तर शिमला मिरची मात्र एकदम कमी भाव म्हणजे फक्त दर दहा किलोला 30 ते 40 रुपये इतका भाव कोसळला.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply