Breaking News

सोन्याच्या वाडीचे पुनर्वसन

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची ग्वाही; ग्रामस्थांना दिलासा

माणगाव ः रामप्रहर वृत्त

अतिवृष्टीमुळे गोरेगाव विभागातील सोन्याच्या वाडीमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. या वाडीचे पुनर्वसन केले जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली.

या जलप्रलयामुळे संपूर्ण सोन्याच्या वाडीला पुराच्या पाण्याने अक्षरशः वेढा घातला होता. या पूरस्थितीतून जीवाची पर्वा न करता जिगरबाज माणगाव पोलीस आणि एनडीआरएफच्या बचाव पथकाने सोन्याच्या वाडीतील भयभीत झालेल्या ग्रामस्थांना पुराच्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढले होते. माणगाव तालुक्यातील गोरेगावनजीक असलेल्या या पूरग्रस्त सोन्याच्या वाडीची पाहणी करण्यासाठी शनिवारी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी प्रशासकीय अधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत या गावाची पाहणी केली आणि ग्रामस्थांसोबत संवाद साधला. सोन्याच्या वाडीवर दरवर्षी पावसाळ्यात ओढावणार्‍या या जीवघेण्या पूरस्थितीमुळे या गावातील ग्रामस्थांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे गावाच्या पुनर्वसनाची मागणी केली. तिथल्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पालकमंत्र्यांनी या गावाच्या पुनर्वसनाची मागणी त्वरित मंजूर करण्याचे आदेश शासकीय अधिकारी व माणगाव तहसीलदार प्रियंका अहिरे, तलाठी, ग्रामसेवक यांना दिले, तसेच ग्रामस्थांसाठी पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घर उपलब्ध करून त्याच ग्रामपंचायतीच्या आवारात पर्यायी जागा उपलब्ध करून पुनर्वसनाचे आदेशही दिले. या वेळी माणगाव तालुका भाजप अध्यक्ष संजय (अप्पा) ढवळे, तालुका सरचिटणीस योगेश सुळे, अशोक यादव, अश्विनी यादव, किशोर पवार, नाना महाले, जयेंद्र मुंढे, युवराज मुंढे, शहानाज खाचे, अस्लम भौर, मिलिंद जोशी, राजू परांजपे, सारिका काळेकर, बाबूराव चव्हाण, संजय जाधव, राजू मुंढे, यशोधरा गोडबोले, मेघा धुमाळ आदी कार्यकर्ते आणि सोन्याच्या वाडीतील सर्व पूरपीडित ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

गव्हाण ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा

उलवे नोड : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित ग्रामसभा शुक्रवारी (दि.१) माजी …

Leave a Reply