शहरामधील जीवनमान हे ग्रामीण जीवनमानापेक्षा अधिक धावपळीचे आणि धकाधकीचे असते. शहरामधील प्रदूषण, आवाज, तणाव, जेवणाच्या पद्धती यांमुळे शरीरावर दुष्परिणाम होतात. त्यातही ध्वनिप्रदूषणामुळेही अनेकांना त्रास होतो. म्हणूनच शहरांमध्ये कामानिमित्त दैनंदिन प्रवास करणारे अनेक जण गाड्यांच्या आणि इतर आवाज ऐकण्याऐवजी इयरफोन्स किंवा हेडफोन्स कानाला लावून गाणी ऐकत प्रवास करणे पसंत करतात, मात्र आता या कृत्रिम ध्वनिप्रदूषणाचा धोका अधिक वाढला असल्याचे एका संशोधनामधून समोर आले आहे. या संशोधनाच्या अहवालानुसार जगातील 110 कोटी लोकांना बहिरेपणाचा धोका आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्यूएचओ) नुकताच हा अहवाल जाहीर केला आहे. दैनंदिन जिवनात लोकांवर ध्वनिप्रदूषणाचा काय परिणाम होतो यासंदर्भातील एका संशोधनानंतर हा अहवाल सादर करण्यात आला. या अहवालानुसार कानामध्ये रोज हेडफोन टाकून मोठ्याने गाणी ऐकण्याची सवय असणार्यांना बहिरेपणा येण्याचा धोका अधिक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. जगातील 110 कोटी लोकांना बहिरेपणा येऊ शकतो अशी शक्यता या अहवालात ‘डब्यूएचओ’ने व्यक्त केली आहे. त्यातही हेडफोन्सचा वापर मोठ्या प्रमाणात होत राहिला, तर जगभरामधील 12 ते 35 वयोगटातील तरुणांना लवकरच बहिरेपणाचा त्रास होऊ शकतो असेही या अहवालात म्हटले आहे. कोणतीही सामान्य व्यक्ती 85 डेसिबलपर्यंतचा आवाज आठ तासांसाठी किंवा 100 डेसिबलचा आवाज 15 मिनिटांसाठी सहन करू शकते, मात्र यापेक्षा जास्त आवाज कानावर पडत राहिल्यास कानातील आतील भागावर परिणाम होऊन बहिरेपण येऊ शकतो. दैनंदिन जीवनामध्ये एकमेकांशी साधला जाणारा संवाद हा 60 डेसिबल इतक्या आवाजात असतो.
Check Also
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे -आमदार प्रशांत ठाकूर
खारघरमध्ये पर्यावरणपूरक शवदाहिनीचे लोकार्पण, प्राणी अंत्यसंस्कार केंद्राचे भूमिपूजन खारघर ः रामप्रहर वृत्तपर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपण …
RamPrahar – The Panvel Daily Paper