पनवेल : रामप्रहर वृत्त
महाराष्ट्र सरकारचे महिलावर्गाबरोबर जिव्हाळ्याचे नाते असून, ते अधिक दृढ व्हावे यासाठी भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चातर्फे रक्षाबंधनानिमित्त शक्ती सन्मान महोत्सव राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून रायगड जिल्ह्यातून जमा झालेल्या जवळपास 14 हजार राख्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुंबईला रवाना करण्यात येणार असल्याची माहिती महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा कल्पना राऊत यांनी दिली.
शक्ती सन्मान महोत्सवांतर्गत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी 1 ते 12 ऑगस्टपर्यंत घरोघरी जाऊन महिलांसाठी शासनाने केलेल्या योजना महिलांपर्यंत पोहोचविल्या आणि त्यांच्याकडून मुख्यमंत्र्यांच्या नावाने राख्या घेतल्या. विशेष म्हणजे या राखीच्या माध्यमातून महिलांना मुख्यमंत्र्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळाली आहे. प्रत्येक बूथ स्तरावरून राख्यांचे संकलन व्हावे यासाठी भाजपच्या महिला मोर्चाची यंत्रणा प्रदेशाध्यक्षा माधवी नाईक यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत झाली होती. यात बूथप्रमुख, शक्तिकेंद्र प्रमुख, मंडल अध्यक्ष, विस्तारक आणि लोकप्रतिनिधींची भूमिका महत्त्वाची राहिली आहे.
15 ऑगस्टपर्यंत राज्यभरातून राख्या संकलित झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्या 20 ऑगस्टला एकत्रितपणे प्रदान करण्याचा समारंभ सायनच्या (मुंबई) षण्मुखानंद हॉलमध्ये होणार आहे. या समारंभास प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या वेळी महिला मोर्चाकडून पूरग्रस्तांसाठी आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात येणार आहे, असेही कल्पना राऊत यांनी सांगितले.