कर्जत, खोपोली : प्रतिनिधी
येथील अभिनव ज्ञानमंदिर संस्थेने कोल्हापूर, सांगलीमधील पूरग्रस्तांसाठी मदतनिधी गोळा करून त्याचा धनादेश जनकल्याण समितीकडे सुपूर्द केला. यासाठी संस्थेच्या प्रांगणात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
संस्थेचे सर्व पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी व पालक यांनी पूरग्रस्तांसाठी निधी गोळा केला असल्याची माहिती संस्थेचे सचिव जनार्दन मोघे यांनी प्रास्ताविकात दिली. कोषाध्यक्ष विनायक चितळे यांनी पूरग्रस्तांसाठी गोळा केलेल्या निधीचा हिशेब दिला. कार्याध्यक्ष गणेश वैद्य यांनी चार लाख 30 हजार 103 रुपयांचा धनादेश जनकल्याण समितीचे कुलाबा जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद जोशी व कार्यवाह नितीन भावे यांच्याकडे सुपूर्द केला. नितीन भावे यांनी जनकल्याण समितीतर्फे सुरू असलेल्या सामाजिक उपक्रमाची माहिती दिली.
किसान संघाचे प्रा. चंद्रकांत कुडे, सहकार्यवाह अनिल जोशी, संस्थेचे पदाधिकारी नंदकुमार मणेर, रवींद्र खराडे, मुख्याध्यापक सचिदानंद जोशी, उपमुख्याध्यापक अनिल चिनके, प्रभारी प्राचार्य पांडे, शारदा मंदिरच्या प्रभारी मुख्याध्यापिका सरिता देशमुख, वांगणी येथील महात्मा फुले शाळेचे मुख्याध्यापक झरेकर, कडाव विद्यालयाचे मुख्याध्यापक सांगळे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या वेळी उपस्थित होते.