नागोठणे : प्रतिनिधी
म. गांधी जयंतीपासून (2 ऑक्टोबर) नियमित वापरात येणार्या प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर पूर्णपणे बंदी येणार असून कापडी किंवा कागदी पिशव्यांचाच वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन सरपंच डॉ. मिलिंद धात्रक यांनी नागरिकांना केले.
‘स्वच्छता हीच सेवा‘ या अभियानांतर्गत प्लास्टिक कचरा व्यवस्थापनावरील विशेष ग्रामसभा मंगळवारी (दि. 17) नागोठणे ग्रामपंचायत सभागृहात पार पडली. या वेळी अध्यक्षीय भाषणात डॉ. धात्रक बोलत होते. सभेला रोहे पंचायत समितीचे विस्तार अधिकारी दांडेकर, उपसरपंच सुप्रिया महाडिक, ग्रामविकास अधिकारी मोहन दिवकर, ग्रामपंचायत सदस्य शैलेंद्र देशपांडे, मोहन नागोठणेकर, ज्ञानेश्वर साळुंखे, अखलाक पानसरे, अतुल काळे, रंजना राऊत, माधवी महाडिक, मंगी कातकरी यांसह व्यापारी संघटनेचे प्रकाश जैन, अनिल काळे, महेश मेहता, रमाकांत काळे, चंद्रकांत गायकवाड, नंदा गायकवाड, आनंद लाड, असिफ अधिकारी, बाळू रटाटे तसेच बचतगट, अंगणवाडी सेविका यांचे प्रतिनिधी व नागरिक उपस्थित होते.
सभेच्या प्रारंभी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्याचा ठराव संमत करण्यात आला. पंतप्रधान मोदी यांच्याकडून प्लास्टिकबंदीबाबत सरपंच डॉ. धात्रक यांना आलेल्या पत्राचे प्रमोद चोगले यांनी जाहीर वाचन केले. विस्तार अधिकारी दांडेकर यांनी आपल्या भाषणात प्लास्टिक निर्मूलनाबाबत माहिती देताना महिलांनी कागदी पिशवी तसेच कागदी पत्रावळी तयार करण्याचा उपक्रम राबविला तर त्यांना निश्चितच रोजगार उपलब्ध होईल, असे स्पष्ट केले. गतवर्षी नागोठणे ग्रामपंचायतीकडून महिला बचतगटांना कागदी पिशवी तयार करण्याचे प्रशिक्षण दिले. आता प्लास्टिक पिशवी पूर्णपणे बंद होणार असल्याने बचतगटांना कागदी पिशवीचा आकार, इतर आराखड्याची माहिती रोहे पंचायत समितीकडून उपलब्ध करून घ्यावी, असे ग्रामविकास अधिकारी दिवकर यांनी सांगितले. माजी सरपंच प्रकाश जैन, प्रकाश कांबळे यांनीही मनोगत व्यक्त केले.
RamPrahar – The Panvel Daily Paper