मुंबई : प्रतिनिधी
अपंगांच्या विश्वचषक ट्वेन्टी-20 क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद मिळवणार्या भारतीय क्रिकेटपटूंसह सर्व क्रीडाप्रेमींसाठी खूशखबर आहे. 2021च्या अपंगांच्या ट्वेन्टी-20 विश्वचषकाचे यजमानपद भारताला बहाल करण्यात आले आहे.
गेल्या महिन्यात अपंगांच्या पहिल्यावहिल्या ट्वेन्टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने यजमान इंग्लंडला 36 धावांनी धूळ चारून विजेतेपद मिळवले होते. मुंबईत या विश्वविजेत्या खेळाडूंसह प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी संघ संचालक विनोद देशपांडे यांनी पुढील स्पर्धेचे यजमानपद आपल्याला मिळाल्याचे जाहीर केले.
या सोहळ्यास केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी, माजी महिला क्रिकेटपटू डायना एडल्जी, माजी क्रिकेटपटू करसन घावरी आदी मान्यवर उपस्थित होते.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अपंग क्रिकेट संघाच्या कामगिरीची दखल घेतली असून, लवकरच या सर्व खेळाडूंचा रोख पारितोषिके देऊन गौरव केला जाईल, असे डायना एडल्जी यांनी सांगितले.
RamPrahar – The Panvel Daily Paper