म्हैसूर : वृत्तसंस्था
भारत ‘अ’ संघाचा प्रतिभावान फलंदाज प्रियांक पांचाळने दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाविरुद्धच्या चार दिवसीय कसोटी सामन्याच्या दुसर्या डावात झुंझार शतक झळकावले, परंतु दिवसाचा खेळ संपल्यावर पंचांनी हा सामना अनिर्णित जाहीर केल्याने भारताने या मालिकेत 1-0 असे यश संपादन केले.
बिनबाद 14 धावांवरून पुढे खेळताना भारताने सावध खेळ केला. पहिल्या डावात भारताला फक्त 17 धावांची आघाडी घेण्यात यश आल्यावर दुसर्या डावात भारताचे सलामीवीर प्रियांक आणि अभिमन्यू ईश्वरन यांनी 94 धावांची सलामी दिली. अभिमन्यू (37) बाद झाल्यावर गेल्या डावातील अर्धशतकवीर 20 वर्षीय शुभमन गिलसुद्धा शून्यावरच माघारी परतला.
गुजरातच्या प्रियांकने नऊ चौकार आणि चार षटकारांसह 109 धावा करून सामना अनिर्णित अवस्थेकडे झुकवला. त्याने करुण नायरसह तिसर्या गड्यासाठी 82 धावांची भागीदारी रचली. प्रियांक बाद झाल्यावर करुण (नाबाद 51) आणि वृद्धिमान साहा (नाबाद 1) यांनी उर्वरित षटके खेळून काढली.
RamPrahar – The Panvel Daily Paper