Breaking News

पुण्यात ढगफुटी

14 जणांचा मृत्यू; अतिवृष्टीमुळे हाहाकार

पुणे : प्रतिनिधी

पुण्यात मंगळवारी रात्री सुरू झालेल्या पावसाने बुधवारी मध्यरात्री रूद्रावतार धारण केला. या ढगफुटीत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. मुसळधार पावसामुळे घाबरलेल्या नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. दरम्यान, गुरुवारीही (दि. 26) पावसाचा जोर होता.

अतिवृष्टीमुळे शहराच्या मध्य वस्तीतून जाणार्‍या ओढ्यांना पूर आला. कात्रज तलावही ओव्हरफ्लो झाला. त्यामुळे सिंहगड, धनकवडी, सहकारनगर, कात्रज या भागातील सोसायट्या आणि घरांत पाणी शिरले. यात मनुष्यहानीसह जनावरेही दगावली आहेत. आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला असून, नऊ जण अद्याप बेपत्ता आहेत. शिवाय अनेकांचे संसारही उद्ध्वस्त झाले. पाण्याच्या वेगात कात्रज भागात 50हून अधिक दुचाकी आणि चारचाकी वाहून गेल्या आहेत, तर नवीन बोगद्याजवळ दरड कोसळल्यामुळे पुणे-बंगळुरू महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली.

रेसकोर्सजवळील चिमटा वस्ती भागात अनेक घरे पाण्याखाली गेली होती. याबाबत मध्यरात्री 12च्या सुमारास लष्कराच्या दक्षिण कमांडला माहिती देण्यात आली. त्यानंतर जवानांनी तातडीने धाव घेत बचावकार्य सुरू केले. या भागातून 500 नागरिकांना पाण्यातून सुरक्षितपणे बाहेर काढून जवळच्याच सेंट पॅट्रिक चर्च येथे आणण्यात आले. दांडेकर वस्ती, आंबील ओढा परिसरातील घरांतही पाणी शिरल्याने तेथील रहिवाशांना राष्ट्र सेवा दलाच्या निळू फुले कला मंदिरात हलविण्यात आले.

भिंत कोसळून दुर्घटना

भरपावसामध्ये अरण्येश्वर परिसरात टांगेवाले कॉलनीत भिंत कोसळल्याने पाच जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन महिला, दोन पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. आंबिल ओढ्याच्या परिसरातही दोन ठिकाणी भिंती ढासळल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे पुराचे पाणी आजूबाजूच्या सोसायट्यांमध्ये वेगाने शिरले. कोल्हावाडी येथील लेन नंबर एकमधून जाणार्‍या ओढ्याची भिंत कोसळली, तसेच कोथरूड डेपो परिसरातील शास्त्रीनगर भागात मशिदीमागे असलेल्या एका इमारतीजवळील संरक्षक भिंतही पावसाने कोसळली.

Check Also

पनवेलमध्ये एसआयआरसंदर्भात बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्तमतदारयादी विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अभियानासंदर्भात भाजप पनवेल विधानसभा मतदारसंघाचे बीएलए व …

Leave a Reply