नागोठणे : प्रतिनिधी
कुटील राजकारणात रविशेठ पाटील यांचा राजकीय बळी घेण्याचा प्रयत्न केला होता व त्यामुळे नागोठणे विभागातील विकासाची गंगा मागील 10 वर्षांपासून ठप्पच झाली आहे. भाजपने रविशेठ यांना विधानसभेची उमेदवारी देऊन त्यांना खर्या अर्थाने न्याय दिला असून, आता नागोठण्याच्या विकासाची दारे पुन्हा एकदा खुली होणारच, असा ठाम विश्वास भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते जानू कोकरे यांनी ‘राम प्रहर’शी बोलताना व्यक्त केला. भाजप नेते, माजी मंत्री रविशेठ पाटील यांना महायुतीच्या माध्यमातून पेण मतदारसंघातून उमेदवारी दिल्याने या विभागातील सामान्य नागरिक बेहद खूश झाले आहेत. याबाबत वासगाव या डोंगराळ भागात राहणारे आदिवासी बांधवसुद्धा समाधानी असून, या भागात राहणारे जानू कोकरे यांना विचारले असता आमचे स्थानिक नेते मारुती देवरे यांच्या पुढाकाराने तेव्हा मंत्री असलेले रविशेठ पाटील यांनी नागोठणे ते वासगाव, पिंपळवाडी या रस्त्याचे खडीकरण व मजबुतीकरण केल्याने या भागातील आदिवासी बांधवांना न्याय मिळाला होता व त्यानंतर तत्कालीन केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी पंतप्रधान सडक योजनेमार्फत या रस्त्याचे डांबरीकरण केल्याने वाडीतून फक्त 10 ते 20 मिनिटांत वाहनाद्वारे नागोठण्यात येत आहोत. हे सर्व रविशेठ यांच्यामुळेच शक्य झाल्याने हे ऋण येथील मतदार विसरणे शक्यच नाही. माझ्याबरोबर आमच्या पाटणसई ग्रामपंचायतीचे उपसरपंच लिंबाजी पिंगळे, गणपत पिंगळे, दुर्गा उघडा, कमलाकर बांगारा, गंगाराम आखाडे, रघू भला ही मंडळी या भागात असलेल्या पाच वाड्यांमध्ये रविशेठ यांना निवडून आणण्यासाठी झटत असून, रविशेठ यांना या भागात एक नंबरची आघाडी मिळवून देणे हे आमचे सर्वांचे मुख्य ध्येय असल्याचे कोकरे यांनी या वेळी स्पष्ट केले.