Breaking News

खालापुरात टाकाऊ प्लास्टिक खाल्ल्याने दोन गुरे दगावली

अत्करगाव परिसरातील घटना; पोलिसांत तक्रार

खोपोली : प्रतिनिधी

खालापूर तालुक्यातील अत्करगाव या गावाच्या हद्दीत एका कारखान्याने कंपाऊंड न करता त्यांच्या मालकीच्या मोकळ्या जागेत केमिकलमिश्रित प्लास्टिक टाकल्याने सदरचे प्लास्टिक येथील दोन गुरांनी खाल्ल्याने ती बेशुद्ध होऊन मरण पावल्याची घटना रविवारी (दि. 3) दुपारी घडली. या प्रकरणी येथील नागरिकांनी या कंपनी मालकाच्या बेपर्वाईबाबत संताप व्यक्त करीत खोपोली पोलीस ठाण्यात तक्रार देऊन कारवाईची मागणी केली आहे.

खालापूर तालुक्यातील साजगाव ढेकू, अत्करगाव होनाड परिसरात मोठ्या प्रमाणात कारखाने आहेत. यातील अत्करगाव ग्रामपंचायत हद्दीत मे. अग्रवाल ब्रदर्स नावाचा कारखाना असून, या कंपनीच्या मालकीच्या जागेत कारखान्यात उत्पादनासाठी वापरलेले केमिकलचे टाकाऊ प्लास्टिक टाकण्यात येते. हे प्लास्टिक खाल्ल्याने रविवारी दोन गुरांना गुंगी येऊन त्याच ठिकाणी त्यांचा तडफडून मृत्यू झाल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली.  याबाबत कारखान्याचे मालक सुनील रमेश अग्रवाल यांच्या विरोधात खोपोली पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. या मालकावर कडक कायदेशीर कारवाई करावी व गुरेमालकांना भरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत कारखाना व्यवस्थापनाशी संपर्क केला असता कोणीही माहिती देण्यास व काहीही बोलण्यास नकार दिला.

Check Also

उलवे नोडमध्ये रविवारी महासंस्कृती : जागर स्त्री शक्तीचा सांस्कृतिक कार्यक्रम

भजनी मंडळांना भांडवली अनुदानाचे होणार वाटप पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि …

Leave a Reply