दोहा (कतार) : वृत्तसंस्था
महाराष्ट्राची अव्वल नेमबाज तेजस्विनी सावंत हिने ऑलिम्पिकचे तिकीट पक्के केले आहे. 14व्या आशियाई अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत तेजस्विनीला महिलांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात पदकापर्यंत झेप घेता आली नसली तरी तिने पुढील वर्षी रंगणार्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे आणखी एक स्थान
निश्चित केले.
अंतिम फेरीत मजल मारणार्या आठपैकी पाच जणींनी याआधीच ऑलिम्पिकचे स्थान पक्के केल्यामुळे अन्य तीनपैकी एका स्थानावर भारताला मोहोर उमटवता आली. पात्रता फेरीत 1171 गुणांची कमाई करून पाचव्या स्थानासह 39 वर्षीय तेजस्विनीने अंतिम फेरीत मजल मारली होती. कडवी लढत देऊनही तिला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. तिने 435.8 गुण मिळवले. अंतिम फेरीतील दुसर्या टप्प्यात तेजस्विनी तिसर्या स्थानी होती, पण 8.8 गुणांचा वेध घेतल्यामुळे ती मागे पडली.
2008, 2012 आणि 2016 ऑलिम्पिकचे तिकीट न मिळाल्याने तेजस्विनीला आता पहिल्यांदाच ऑलिम्पिकवारी करण्याची संधी मिळणार आहे. यंदा ऑलिम्पिकमध्ये स्थान निश्चित करणारी राही सरनोबतनंतर ती कोल्हापूरची दुसरी नेमबाज ठरली आहे. 39 वर्षांच्या तेजस्विनी सावंतने यापूर्वी अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताला यश मिळवून दिले आहे. 2010 सालच्या म्युनिकमध्ये झालेल्या जागतिक नेमबाजी
स्पर्धेत तेजस्विनीने सुवर्णपदक जिंकले होते. त्याआधी 2006च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तिने 10 मीटर्स एअर रायफलमध्ये दुहेरीत आणि वैयक्तिक सुवर्ण जिंकले होते, तर 2018 साली ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्टमध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तिने 50 मीटर्स रायफल थ्री पोझिशन प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली होती.