कोलकाता : वृत्तसंस्था
भारताचा कर्णधार विराट कोहलीने बांगलादेशविरुद्ध दुसर्या कसोटी सामन्यात शतक झळकाविले. दिवस-रात्र कसोटी सामन्यात शतक झळकावणारा विराट कोहली भारताचा पहिला कर्णधार आणि खेळाडू ठरला आहे. विराटने 194 चेंडूंत 18 चौकारांसह 136 धावा केल्या. या खेळीदरम्यान विराटने अनेक विक्रम केले आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार या नात्याने विराट कोहलीचे हे 41वे शतक ठरले. या कामगिरीसह विराटने माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पाँटींगशी बरोबरी केली आहे. त्याचप्रमाणे इंग्लंडचा कसोटी संघाचा कर्णधार जो रुटच्या दिवस-रात्र कसोटीत सर्वाधिक धावा करण्याच्या विक्रमाशी विराटने बरोबरी केली आहे. जो रुटने 2017 साली दिवस-रात्र कसोटीत 136 धावा केल्या होत्या. विराटने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथचा 130 धावांचा विक्रम मोडला.
विराटचे कसोटी कारकिर्दीतील हे 27वे शतक. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी 141 डावांत 27 शतके झळकावण्याच्या सचिनच्या विक्रमाशी विराटने बरोबरी केली आहे.