अमित शहांचे राहुल गांधींना आव्हान
सिमला : वृत्तसंस्था
नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून (सीसीए) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसवर घणाघात केला आहे. ’काँग्रेस आणि कंपनी अफवा पसरवत आहे की हा कायदा अल्पसंख्याकांचे नागरिकत्व हिरावून घेणारा आहे. मी राहुल गांधी यांना आव्हान देतो की या कायद्यात एकाही ठिकाणी अशी तरतूद असेल की ज्यामुळे कोणाचे नागरिकत्व हिरावून घेता येईल तर ते मला दाखवून द्यावे,’ असे शहा यांनी ठणकावले आहे.
हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला येथे अमित शहा बोलत होते. ते म्हणाले, देशातील सर्व मुस्लिम बांधव-भगिनींना मी आवाहन करतो की, आधी नागरिकत्व सुधारणा कायदा काय आहे ते समजून घ्या आणि मग इतरांनाही समजावून सांगा; अन्यथा खोटेनाटे पसरवून दिशाभूल करणारे राजकीय पक्ष आपल्या वोटबँकेच्या स्वार्थासाठी आपल्यात भांडणे लावत राहतील.
हिमाचल प्रदेश सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने शहा यांनी सांगितले की, 1950मध्ये नेहरू-लियाकत सामंजस्य करार झाला. या कराराच्या माध्यमातून दोन्ही देश आपल्याकडील अल्पसंख्याकांचे संरक्षण करतील, असे ठरले होते, पण आज लाखो शरणार्थींकडे कोणाचे लक्ष नाही.