पनवेल : प्रतिनिधी
गाढी नदीच्या किनार्याजवळ भिंगारीसमोर राष्ट्रीय महामार्गावरील पुलाचे आणि सर्व्हिस रस्त्याचे काम सुरू असून, त्या ठिकाणी कामाला लागणारे साहित्य आणि कामगारांना तात्पुरती बसण्यासाठी सोय म्हणून असलेले गाळे रस्त्याचे काम पूर्ण झाल्यावर पाडून टाकण्यात येणार आहेत. पनवेल महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने रस्त्याचे काम रखडून लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी हे गाळे तूर्त पाडले नाहीत, कोणाला अभय देण्यासाठी नाही, अशी माहिती पनवेल महापालिकचे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली. पनवेल महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागाने गाढी नदीच्या किनार्याजवळ भिंगारीसमोर 28 गाळे शुक्रवारी (दि. 8) जमीनदोस्त केले. त्या वेळी पक्षपात करून टीआयपीएल कंपनीचे कार्यालय असलेले गाळे पाडले नाहीत अशी ओरड करण्यात आली, मात्र त्या ठिकाणी टीआयपीएल कंपनीचे कोणतेही कार्यालय नसून राष्ट्रीय महामार्गावरील पुलाचे आणि सर्व्हिस रस्त्याचे कामही कंपनी करीत आहे. या कामाला लागणारे साहित्य आणि कामगारांना तात्पुरती बसण्यासाठी सोय त्या गाळ्यांत केलेली आहे. अशा प्रकारे शेड उभारून तात्पुरती व्यवस्था महामार्गावर ज्या ठिकाणी काम सुरू असते तेथे सर्वत्र केली जाते.
टीआयपीएल कंपनीने आपले महामार्गाचे काम जून महिन्यापर्यंत पूर्ण होईल त्यानंतर आपण या तात्पुरत्या उभारलेल्या शेड स्वतः तोडून टाकू, असे सांगितल्याने महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने अनधिकृत बांधकामावर केलेल्या करवाईच्या वेळी हे गाळे तोडले नाहीत.
अतिक्रमणविरोधी कारवाईच्या वेळी राष्ट्रीय महामार्गावरील पुलाचे आणि सर्व्हिस रस्त्याचे काम करणार्या टीआयपीएल कंपनीचे गाळे पाडले नाहीत; कारण त्यांनी रस्त्याच्या कामाचे साहित्य ठेवण्यासाठी त्याचा वापर केला आहे. रस्त्याचे काम हे महत्त्वाचे असल्याने लोकांची गैरसोय होऊ नये आणि कंपनीने काम पूर्ण झाल्यावर स्वतः तोडणार सांगितल्याने आम्ही त्याच्यावर कारवाई केली नाही.
-जमीर लेंगरेकर, उपायुक्त, पनवेल महापालिका